Breaking News

दुचाकी जळित प्रकरणी पोलीस यंत्रणा ढिम्म! पोलिसांना आरोपी सापडेनात ; केवळ हप्त्यांवरच मदार


कोपरगाव / प्रतिनिधी  : -नाशिक, अहमदनगर पाठोपाठ आता कोपरगाव शहरात दुचाकी वाहन जाळण्याचे लोण कोपरगाव शहरात धडकले. शारदानगर भागात राहणारे अशोक कचरू टेंबरे यांच्या ओमसाई जनार्धन यांच्या मालकीच्या कंपाऊंडमध्ये उभ्या लावण्यात आलेली पाच दुचाकी वाहने जाळण्यात आली. पोलिसांना मात्र आरोपींचा अद्यापपर्यंत थांगपत्ता लागला नाही. या घटनेप्रकरणी पोलीस यंत्रणा सुस्तावली आहे. मात्र शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांतून मिळत असलेल्या हप्त्यांवरच पोलिसांवर सारी मदार असल्याचे बोलले जात आहे. 

येथील दुचाकी वाहने अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्याने संबंधितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या दुचाकी वाहानांमध्ये पेट्रोल असल्याकारणाने या वाहनांचा प्रचंड स्फोट झाला. टेंबरे यांच्या घराच्या छताचे प्लास्टर खाली पडले. घराच्या प्रवेशद्वाराचेही नुकसान झाले. या आगीने रुद्र अवतार धारण केल्याने या आगीचा परिणाम अन्य इमारतींवर झाला. अशोक टेंबरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी या आगीचा सामना करीत घरातील बोरवेलच्या साह्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती कोपरगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेमध्ये अशोक टेंबरे यांच्या टी व्ही एस स्टार सिटी, टी व्ही एस पीप, मोटो प्लोजर, प्याशन प्रो आणि टेंबरे यांच्या निवास्थानी भाडेकरू म्हणून राहत असलेले राजस्थान येथील करनिदान चरण यांची आय स्मार्ट ही दुचाकी वाहने देण्यात आली. यामागे काहीही शक्यता तूर्तास वर्तवण्यात आली नाही. मात्र शहर पोलीस नेहमीप्रमाणेच संथगतीने या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, शहरातील पांडेगल्ली, सराफ बाजार येथील मुंबादेवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. 

कोपरगावात एकीकडे वाढत्या चोऱ्या, वाहने जाळण्याचे प्रकार वाढत आहेत. दुसरीकडे शहरात वाढत्या अवैध धंद्यांबरोबरच गुन्हेगारी वाढत आहे. मात्र या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास स्थानिक पोलिसांनाअद्यापपर्यंत यश आले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता, भिती आणि संताप अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.