Breaking News

धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला नसून सरकारने केलेली ही हत्याच : धनंजय मुंडे


न्यायासाठी लढणार्‍या धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला नसून सरकारने केलेली ही हत्याच आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत असतांना ते बोलत होते. धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक असून न्यायासाठी त्यांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांना न्याय द्यावा असे सरकारला कधी वाटले नाही. त्यामुळे या मृत्यूस केवळ सरकारच जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट हेतूने चुकीची परिगणणा केली तसेच जिल्हा स्तर ते मंत्रालय यामध्ये त्यांनी ज्यांच्याकडे न्याय मागितला मात्र तरी देखील त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा, या प्रकरणात दोषी असलेल्या तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पासून ते जिल्हाधिकारी या सर्वांना निलंबित करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.