Breaking News

दुर्बल गरजूंपर्यंत योजनांची माहिती पोहचणे गरजेचे- न्या. सूर्यकांत शिंदे


नाशिक, दि. 31, जानेवारी - समाजातील दुर्बल गरजूंपर्यंत योजनांची माहिती पोहोचणे गरजेचे असून न्यायालयांनी त्यासाठी योगदान देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून विविध शासकिय विभागांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले.

विधी सेवा शिबिर व शासकिय योजनांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिंदे म्हणाले की, शासन राबवत असलेल्या योजनांची माहिती सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी शासनाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी त्यांच्या अडचणी समजावून घ्यावी व त्यांना मार्गदर्शन करावे. एकाच ठिकाणी माहिती मिळत असल्यामुळे त्याचा उपयोग गरजू दुर्बल लोकांपर्यत पोहोचण्यास होईल असे ते म्हणाले.

डॉ. सिंगल म्हणाले, ग्रामीण भागातील गरीबांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती कोठे मिळेल हे माहित नसल्यामुळे प्रयत्न करुन देखील ती मिळत नाही व त्यापासून वंचित राहावे लागते. मेळाव्याचा त्यांना फायदा होईल. ही माहिती अनेकांपर्यत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.