Breaking News

अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सातारा : महाबळेश्‍वर तालुक्यात निसर्गाला गालबोट लावून धनदांडग्यांकडून अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे पर्यटनस्थळाला बाधा पोहोचत आहे. तसेच येथील निसर्ग सौंदर्य कालबाह्य होत आहे. त्यामुळे महाबळेश्‍वरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाका, असा आदेश पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी दिला. दरम्यान, सेना-भाजप सत्तेत आल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी महिलांची नेमणूक करण्यात येत असल्याचा जुना अनुभव आहे. त्याचीच पुनरावृत्ती सेना-भाजप सत्तेत आल्यानंतर झाली आहे. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशानुसार वंदना खुल्लर यांच्या कार्यकालात महाबळेश्‍वर शहर परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. 


आताही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या कार्यकालात पालकमंत्र्यांनी अतिक्रमणाबाबत डरकाळी फोडली आहे. त्यामुळे अनाधिकृत बांधकामासह शासकीय जागेत झालेल्या अतिक्रमणांवर लवकरच बुलडोजर फिरवला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महाबळेश्‍वर येथे आयोजित शेतकरी कर्जमाफी योजना व अनधिकृत बांधकामांविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार राजेश शेंडगे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शहरप्रमुख विजय नायडू, बांधकाम अभियंता महेंद्र पाटील, विद्युत मंडळ अभियंता चांदणे उपस्थित होते. 

ना. शिवतारे म्हणाले, महाबळेश्‍वर नगरपालिका व उपविभागीय अधिकारी वाई यांनी संयुक्त कारवाई करून अनधिकृत बांधकामावर कायद्याची जरब बसवावी. अनाधिकृत बांधकामे शोधून कोणाचाही मुलहिजा न ठेवता कारवाई करा. महाबळेश्‍वर पालिकेच्या हद्दीमध्ये वृक्षतोड व अनधिकृत बांधकामांचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर कारवाई करावी. शहरात जागोजागी लटकलेल्या तारा त्वरित काढून टाकाव्यात, आंबिका नामदेव सोसायटी येथील उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या त्वरित दुरुस्त कराव्यात, छत्रपती शिवाजी चौक, सुभाष चौक, बाळासाहेब ठाकरे चौकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला असून लवकर कामे सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

मागील पंधरा वर्षापूर्वी राज्यात सेना-भाजपची युती होऊन युती सरकार सत्तेत आले होते. त्या काळात सातारा जिल्ह्यात सर्वत्र अतिक्रमणे बोकाळली होती. यावर जालीम उपाय म्हणून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीनंतर नव्याने रुजू झालेल्या सातारच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वंदना खुल्लर यांना इंदापूरचे त्या काळातील आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशानुसार अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला लोकांनी केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास आल्यानंतर वंदना खुल्लर यांनी स्वत: महाबळेश्‍वर तालुक्यातील असंख्य हॉटेल, रिसॉर्ट तसेच टपर्‍या, बंगल्यांना बुलडोजर लावून जमिनदोस्त केले होते. त्याचप्रमाणे आताही सेना-भाजपची युती होऊन युतीचे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. त्यानुसार नव्या सरकारने जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांना नागपूरला नेले. तर त्यांच्या जागी मंत्रालयात कार्यरत असलेल्या श्‍वेता सिंघल यांची नेमणूक केली. 

सिंधल ह्या सातारच्या इतिहासात दुसर्‍या महिला जिल्हाधिकारी आहेत. तसेच सेना-भाजपच्या सत्तेतील शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अनाधिकृत बांधकामे व शासकीय जागेतील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकार्‍यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील अतिक्रमणे तसेच अनाधिकृत बांधकामे अखेरची घटका मोजत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातारचे पालकमंत्री स्वत: पुणे जिल्ह्यातून निवडणूक लढवित असल्याने सातारा जिल्ह्यातील कोणाचे अतिक्रमण जिल्हाधिकारी हटवणार याकडे लक्ष देण्याची तसदी घेणार नाहीत. तसेच त्यात बेरीज-वजाबाकीचे राजकारण होण्याचा विषयच येत नाही. मुळात सातारा जिल्ह्यात सेना-भाजपचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच आमदार एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत.