Breaking News

जनतेचा कौल भाजपविरोधातच : हार्दिक

अहमदाबाद : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मते न देण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असा दावा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांने केला आहे. ’मला गुजरातमध्ये बदल घडवून आणायचा आहे. भाजपची सत्ता गुजरातच्या जनतेला संपुष्टात आणायची आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृत्तपत्रे, मजूर, व्यावसायिक, व्यापारी वा उद्योजक सत्ताधारी पक्षामुळे कोणीही समाधानी नाही आणि याच कारणामुळे जनता आमच्या आंदोलनाला, बैठकांना, सभांना पाठिंबा देत आहेत. म्हणूनच मतदारांनी भाजपला मते न देण्यासाठी आपला निर्धार केला आहे,’ असे हार्दिकने म्हटले आहे. 


हार्दिक म्हणाला, ’भाजप राज्य, जिल्ह्यानंतर एका पाठोपाठ गावोगावी जाऊन मतदारांचे लक्ष्य आपल्याकडे वळवत आहेत. त्यासाठी भाजपने स्टारप्रचारकाच्या माध्यमातून रॅली, जनसभा, बैठका घेत आहेत. मात्र, मते कोणाला द्यायची, हे गुजरातच्या जनतेला माहीत आहे.’

पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक यांनी आंदोलन उभारले आहे आणि याचाच फायदा हार्दिक यांना निवडणुकीत होईल, असा अंदाज राजकीय विश्‍लेषकांनी बांधला आहे. हार्दिकने भाजप विरोधात काँग्रेस पाठिंबा दिल्याने संपूर्ण पाटिदार समाज काँग्रेसकडे झुकणार का?, याची उत्सुकता आहे.