भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीमुळे देशाची सर्वसमावेशक प्रगती - डॉ.अनंत कळसे
महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘भारतीय संविधानाच्या संदर्भात जगातील राज्यघटनांचे तुलनात्मक विश्लेषण’ या विषयावर ते बोलत होते.डॉ.कळसे म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये देशात कायदेमंडळाला कायदे, धोरणे बनविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. हे कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार असते. कायदेमंडळ हे कार्यकारी मंडळावर सनियंत्रण करते. कायदेमंडळातील सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळावर असल्याने विविध योजना, धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होते.