Breaking News

चोराने सोन्याच्या बांगड्या खोट्या समजून फेकल्या

मुंबई, दि. 14, डिसेंबर - बोरिवली येथील श्रीकांत दामानी या चोराने चोरलेल्या बांगड्या खोट्या समजून फेकून दिल्याची घटना घडली आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या कबुलीत याबाबत माहिती मिळाली. या बांगड्यांची किंमत ही दोन लाख रुपयांहून अधिक असल्याचे अधिका-यांनी सांगितले.


15 नोव्हेंबर रोजी बोरिवलीवरून वाशीला जाणार्‍या अरुण गर्ग (59) यांची पर्स चोरीला गेली होती. या पर्समध्ये 7 लाख रुपयांचे दागिने होते. त्यानंतर दिनांक 21 नोव्हेंबर रोजी बोरिवली स्थानकातून जयपूरला जाणार्‍या प्रकाश केडीया (54) यांच्या सामानातून 3 लाख 40 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांनी भरलेली पर्स अज्ञाताने पळवली. या प्रकरणी त्यांनी रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या दोन्ही चोरींच्या प्रकरणाचा तपास करणार्‍या बोरिवली जीआरपीने श्रीकांत दामानी या चोराला अटक केली. 


पोलिसांनी दामानीकडे बांगड्यांबद्दल चौकशी केली असता, त्या दोन्ही बांगड्या खोट्या वाटल्याने बोरिवली येथील कचर्‍याच्या ढिगार्‍यात फेकून दिल्याचे आरोपींने सांगितले. त्यानंतर बांगड्या शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मिळाल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.