Breaking News

प्राजक्त तनपुरे यांनी दर्शविली दक्षिणेतून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी.

संतोष जाधव , राहुरी :- अहमदनगर दक्षिण मतदार संघात जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली तर खासदारकी लढविण्यास तयार असल्याचे सांगत प्रसाद शुगरचे अध्यक्ष तथा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी थेट विखेंचे मनसुबे उधळून लावण्याचेच सुतोवाच केले आहेत.



गुजरातमधील निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्राजक्त तनपुरे यांनी हे विधान केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ़ उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढविली होती. निवडणुकीनंतर तनपुरे शिवसेनेत रमले नाहीत मुळात तनपुरेंचा पिंड हा शिवसेनेशी जुळणारा नव्हताच तनपुरेंनी मातोश्री गाठत हाती शिवबंध बांधण्याचा प्रयत्न केला खरा मात्र शिवसेनेची आक्रमक भुमिका मुळच्या राष्ट्रवादी असलेल्या तनपुरे यांच्या अंगी रुजलीच नसती. 

त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत हाती घड्याळ बांधण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी वाढविली राहुरी नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणूकीत सुसंस्कृत स्वाभिमानी नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत प्राजक्त यांचा राजकीय श्रीगणेशा होत थेट जनतेतून राहुरीच्या नगरपरिषदेत त्यांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून प्रवेश झाला. 

नगराध्यक्ष झाल्यावर बारामतीकरांनी प्राजक्त तनपुरे यांचे अभिनंदन केले होते यानंतर नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर राहुरी मतदार संघात संपर्क वाढविला होता,त्यामुळे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते, मात्र सोमवारी सायंकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यास स्वारस्य दाखविले आहे.

प्राजक्त तनपुरे हे कोरी पाटी असून दक्षिणेत नातेवाईक व मित्रमंडळ आहे़ माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना उत्तरेत मतदारांनी साथ दिली होती. या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांना दक्षिणेची उमेदवारी मिळाल्यास त्यात ते यशस्वी होऊ शकतात, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. माजी अर्थमंत्री जयंत पाटील हे तनपुरे यांचे मामा असून दक्षिणेत तरूण उमेदवार म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डॉ. सुजय विखे हे भाजपमध्ये जातात की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपमध्ये विखे गेल्यास तनपुरे-विखे या दोन तरूण दादांमध्ये लढत होऊ शकते. नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ राष्ट्रवादीने प्राजक्त तनपुरे यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास विखे यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागणार आहे,

डॉ.सुजय विखे यांनी दक्षिणेकडे लक्ष देत त्या दिशेने घौडदौड सुरु केली आहे तर प्राजक्त यांनीही दक्षिणेची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार असे सुचक वक्तव्य केल्याने त्यांच्या भुमिकेने जिल्ह्यात राजकीय भुकंप सुरु होण्यास सुरुवात झाली असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येते.