Breaking News

मायावतींनी केवळ घोषणा न करता त्वरित बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी - रामदास आठवले

मुंबई : बसपाच्या प्रमुख मायावती या जेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हाच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला हवी होती. मात्र त्या अनेक वर्षांपासून बौद्ध धम्माची दीक्षा घेणार अशी केवळ घोषणा करीत आहेत. प्रत्यक्ष मात्र त्या धम्म दीक्षा घेत नाहीत. मायावती या खऱ्या आंबेडकरवादी असतील तर त्यांनी घोषणाबाजी करून बौद्धांची दिशाभूल करण्यापेक्षा त्वरित बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 


मायावतींनी नुकतीच नागपुरात जाहीर सभेत बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा इशारा हिंदुत्ववाद्यांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मायावतींनी केवळ घोषणा करणे थांबवून त्वरित हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे आवाहन केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मारणार नाही, अशी घोषणा करून कर्मठ हिंदुत्ववाद्यांना इशारा दिला होता. हिंदू धर्मात दलितांना न्याय मिळणार नसल्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खात्री झाल्यानेच त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 

त्याप्रमाणे आम्ही लाखो दलित बौद्ध झालो. मायावती मात्र अजून बौद्ध झाल्या नाहीत. कर्मठ हिंदुत्ववाद्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मात सुधारणा करण्याची संधी दिली होती. मात्र ती होऊ शकत नसल्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खात्री झाल्यानेच त्यांनी बौद्ध धम्म दीक्षा घेतली मग मायावती आता पुन्हा कसली संधी हिंदुत्ववाद्यांना देत आहेत. मायावतींनी डॉ. बाबासाहेबांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने चालावे, असे आवाहन रामदास आठवलेंनी केले आहे.