Breaking News

शिवसेनेने पाठींबा काढला तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही - चंद्रकांत पाटील

जळगाव, दि. 12, नोव्हेंबर - शिवसेनेने जरी पाठींबा काढला तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही, हे सरकार विदाऊट शिवसेनाही पाच वर्ष पूर्ण करेल असे धक्कादायक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांनी हे विधान जळगावमधील पत्रकार परिषदेत केले.


शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारमधून बाहेर पडू शकणार नाही आणि जर पडलीच तर त्याचा परिणाम सरकारवर होणार नाही, सरकारकडे सरकार वाचविण्याची यंत्रणा उभी असेल. हे सरकार विदाउट शिवसेनासुद्धा पाच वर्षांचा काळ पूर्ण करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगून एक प्रकारे शिवसेनेला सज्जड इशाराच दिला असल्याचे मानले जात आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांचे वाढते वर्चस्व पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील असा प्रश्‍न नाना पटोले यांनी उपस्थित केल्याचे त्यांना विचारले असता संपूर्ण राज्य मुख्यमंत्री फडणवीसच चालवतात आम्ही सर्व त्यांचे सहकारी आहोत, ज्या गोष्टी आम्ही त्यांना मदत करत असताना करतो त्यामुळे काहींना असे वाटते की वेगळे सत्तास्थान निर्माण झाले की काय मात्र देवेंद्र फडणवीस यांना जोपर्यंत असे वाटत नाही तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.