Breaking News

सोंग आणणार्‍या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा - शरद पवार.

वर्धा, दि. 19, नोव्हेंबर - संकटे येतच असतात, संकटे येत नाहीत असं नाही परंतु संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न किंवा धोरणात्मक निर्णय राबविण्याची सरकारची जबाबदारी होती परंतु हे सरकार जबाबदारीपासून लांब पळत आहे. हे सरकार संकटामध्ये शेतकर्‍यांच्या पाठीशी राहिलेले मला दिसले नाही. ज्यांना शेतीतील कळत नाही अशा सरकारला खाली खेचण्यासाठी आणि सोंग आणणार्‍या सरकारला ‘तुमचे दिवस भरले आहेत’ असे सांगण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा येथे केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गेले चार दिवस विदर्भ दौर्‍यावर आहेत. आज वर्धातील समारोप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी सरकारवर चौफेर टिका केली. आपल्या भाषणात शरद पवार यांनी कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकेची झोड उठवली. याशिवाय देशात अर्थव्यवस्था संकटात सापडल्याबद्दल चिंताही व्यक्त केली. विविध घटकातील लोकांशी भेटत, शेतकर्‍यांशी संवाद करत तसेच शेतांना भेटी देत हा दौरा संपन्न झाला.
शरद पवार पुढे म्हणाले की, सरकारने कर्जमाफी करताना सहा आदेश काढले. सुरुवातीला काही तारखाही जाहीर केल्या आणि आता 25 नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली आहे. पाच दिवस राहिले आहेत त्यामुळे आपण वाट बघुया कर्जमाफीसाठी असेही शरद पवार म्हणाले. यावेळी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर बोलताना शरद पवार फार गंभीर दिसले. शेतकरी उगीचच जीव देत नाहीत. कुणाला जीव सोपा झाला नाही. शेतकर्‍यांच्या डोक्यावर ओझं निर्माण झाले आहे. 

सरकारने मधल्याकाळात एक अध्यादेश काढला होता. थकबाकीदारांचे चावडी वाचन करण्याचे त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत. विदर्भामध्ये 690 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या यवतमाळ जिल्हयामध्ये झाल्या आहेत. सध्या टिव्हीवर जाहिराती झळकत आहेत त्या तुम्ही बघितल्या का असा प्रश्‍न शरद पवारांनी शेतकर्‍यांना केला . त्यामुळे या फडणवीस सरकारला ‘कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी विचारण्याची वेळ आली आहे.