समाजाचे देणे या भावनेने प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे - गिरीश महाजन
जळगांव, दि. 03, ऑक्टोबर - रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे दुस-याला जीवनदान देणे शक्य आहे. अनेकांचे प्राण त्यामुळे वाचू शकतात. म्हणून रक्तदान करणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त तालुका भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी 204 जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले. मंत्री महाजन पुढे म्हणाले की, देणारा माणूस केव्हाही महान असतो. दानाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. रक्तदानासारखे दुसरे पुण्य कुठलेही नाही.
