Breaking News

कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे दूषित पाण्यामुळे शेकडो ग्रामस्थ अस्वस्थ

नाशिक, दि. 19, नोव्हेंबर - उमराळे येथील शेतकरी विषबाधा प्रकरण, मानी आश्रमशाळेतील मुलींना खिचडीतून झालेली विषबाधा हे आदिवासी बहुल भागातील प्रकरणे ताजी असतानाच नजीकच्या कळवण तालुक्यातील देवळीकराड येथील ग्रामपंचायतीकडून सोडण्यात आलेल्या दुषित पाण्यामुळे शेकडो ग्रामस्थांना आज अस्वस्थ वाटू लागल्याचा प्रकार घडला होता. मात्र परिसरातील डॉक्टरांनी वेळीच खबरदारी घेत उपचार सुरु केल्याने शेतकर्‍यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटिल (कळवण), डॉ.किशोर देशमुख (बेज ), डॉ.सचिन जाधव (कनाशी) व आरोग्य सेविका पि .एस.बहीरम (देवळीवणी), एफ.टी.कवर (बोरदैवत), ए.डी.राउत (देशगाव), के.के,हिरे (देवळीकराड उपकेन्द्र) या सर्वांनी तत्परता दाखवत उपचार केले.
अचानक वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे औषधांचा साठा कमी पडला. तेव्हा तत्काळ तिरळ दवाखान्यात रुग्णवाहिकेने रुग्ण हलविण्यात आले. अनेकांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सोडून देण्यात आले तर काही रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
हा सर्व प्रकार दुषित पाण्यामुळे झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असला तरी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. देवळीकराड ग्रामपंचायतिला वारंवार पाणी शुद्धिकरण करून सोडत जाण्याचे सांगितले असतानादेखील ग्रामसेवक सी.जी.जगताप व सरपंच कमळ कमलाकर गांगुर्डे यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.