Breaking News

लोकसहभागातून सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यास मदतच- आदिक

चार वर्षे घालून जे आधीच्यांना जमले नाही ते नगराध्यक्षा अनुराधा आदिकांनी अवघ्या दोन महिन्यात केल्याने अभ्यासू नेतृत्व असल्याचा कसा फायदा झाल्याची प्रतिक्रिया सीसी टीव्ही कॅमेरा बैठकीसाठी आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली. गुन्हेगारीवर वचक राहावा, शहर सुंदर व सुरक्षित राहावे म्हणून नगरपालिका व पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच याबाबी बैठक घेण्यात आली.


यावेळी आ.भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी सुमंत मोरे, उद्योजक किशोर निर्मळ, नगरसेवक अंजुम शेख, राजेंद्र पवार, केतन खोरे, मुख्तार शाह, संतोष कांबळे, नगरसेविका जयश्री शेळके, राजेश कुंदे, मनोज छाजेड, योगेश जाधव, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, कलीम शेख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.कांबळे म्हणाले की, शहर सुरक्षित व्हावे म्हणून नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी मागणी करताच आपण १० लक्ष रकमेचा निधी दिला. व त्यांनी तो प्रशासकीय मान्यता घेत प्रत्यक्ष कामाच्यादृष्टीने सुरवात केल्याने समाधान मिळाले. याआधी ४ वर्षे हे काम पालिका प्रशासनाला जमले नाही तेच आदिकांनी अवघ्या दोन महिन्यात मार्गी लावल्याने एक दर्जेदार कामाची पद्धत बघायला मिळाली. 

नगराध्यक्षा अनुराधा आदिकांनी उद्योजक, व्यापारी यांच्यासह जनतेला सहकार्याचे आवाहन करत हे गाव आपले आहे ते आपल्याला मिळून सुरक्षित करायचे असल्याचे सांगितले. नगरसेवक अंजुम शेख यांनी याआधी २० लाख रुपये जुन्या प्रशासनाने आणल्याचे सांगितले.

तज्ञ लोकांना ठेका तेव्हा दिल्याचेही सांगितले व दर्जेदार असलेला ७० ते ८० हजार रकमेचा प्रति कॅमेरा घ्यावा म्हणजे बसवून देखावा होणार नाही असा टोला अप्रत्यक्षपणे काम बघणा-यांना मारला. वॉर्ड नंबर २ मधील काही संवेदनशील चौक यात घ्यावे असेही त्यांनी सांगितले.

तर केतन खोरे यांनी बैठकीच्या सुरवातीलाच आमदार निधीतून १० लक्ष रकमेत शहरातील प्रमुख १० चौक सुरक्षित करून सुरवात करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकसहभागातून इतर २८ चौकांना सुरक्षित करण्यासाठी उच्च दर्जाचा कॅमेरा ८ हजार रकमेपासून उपलब्ध असून देणगीदार जास्तीत जास्त रकमेचा कॅमेराही देऊ शकत असल्याचे स्पष्ट केले. तर सुरवातीला सर्वाधिक चैन स्नॅचिंग, चोऱ्या, वाहनचोऱ्या होत असलेल्या भागातील चौक सुरक्षित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत टप्प्याटप्याने शहरातील सर्वच प्रमुख चौक घेणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, मागील सत्ताधारी गटाने विधानपरिषद आ.शरद रणपिसे यांचे १० लाख व आ.अनंत गाडगीळ यांचे ५ लाख असे १५ लाख रुपये सीसी टीव्ही कॅमेरासाठी पत्र घेतले होते तोही निधी न मिळाल्याने त्यावेळी फुसका बार झाला. टेंडरही कोणत्याही तज्ञाला न देता स्थानिक व्यक्तीला दिल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे आधीच्या सत्ताधाऱ्यांनी २० लाख नाही तर १५ लाखांचे फक्त आमदारांचे पत्र दाखवत जनतेला ठेंगा दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.  यावेळी आरोग्य विषयकही चांगली चर्चा झाली. मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी आरोग्यविषयक धडे देत चांगलीच हास्य फवारणी केली. 

शहर स्वच्छ व सुंदर करत असताना नागरिक सहकार्य करतीलच मात्र घनकचरा व्यवस्थापनाचा निकृष्ट काम करणारा ठेकेदार नेमका कोणाचा जावई आहे ? त्याला भरमसाठ पैसे देऊनही तो शहर स्वच्छ ठेवत नाही आणि कामही नीट करत नाही. नगराध्यक्षा अनुराधा आदिक स्वतः या कामावर नाखूष असताना नेमका या ठेकेदाराचा बचाव करणारा कोण? याबाबतही कुजबुज नागरिकां मध्ये सुरू होती.