Breaking News

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी मंत्रालयावर धडकू लागले - राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 11, नोव्हेंबर - शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच शेतकर्‍यांचे आंदोलन थेट मंत्रालयापर्यंत धडकू लागल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हटले आहे.
शेतमालाच्या भावासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचा तरूण शेतकरी ज्ञानेश्‍वर साळवे याने आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर केलेल्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. विखे पुढे म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री शनिवारी मुंबईच्या दौर्‍यावर येत असून, त्यांच्या दौर्‍यापूर्वीच झालेल्या या आंदोलनाने शेतमाल खरेदीबाबत सरकारच्या नियोजनातील अपयश चव्हाट्यावर आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कृषिमंत्र्यांनी केवळ मुंबईत बैठकींचा फार्स न करता प्रत्यक्ष धुर्‍यावर जाऊन शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्याची गरज आहे.