Breaking News

कास पठारकडे जाणारा रस्ता खचल्याने रस्ता बंद

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : कास पठारकडे जाणारा रस्ता खचल्याची माहिती समोर आली. यवतेश्‍वर घाटातील रस्ता खचला आहे. खबरदारीची उपाययोजना  म्हणून पोलिसांनी घाटातून जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. यामुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक घाटात अडकले आहेत. सुदैवाने या घटनेत  कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी पहाटे अचानक हा रस्ता खचल्यामुळे अनिश्‍चित काळापर्यंत हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 
केवळ कास पठारावर राहणार्‍या स्थानिक बाईकस्वारांना वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे ’कास’कडे प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान सुट्टीनिमित्त कास  पठारावर रविवारी मुक्कामी गेलेल्या पर्यटकांना एकीव-कुसुंबी-मेढामार्गे पुढील मार्गासाठी सोडण्यात येत आहे.
शनिवार रविवारला जोडून गांधी जयंती दिनाची सुट्टी आल्यामुळे हजारो पर्यटक सध्या कास पठारावर आहेत. पुण्या-मुंबईकडून हजारो पर्यटक सातार्‍याहून ’कास’कडे  निघाले होते. मात्र सोमवारी पहाटे यवतेश्‍वर घाटातील रस्ता खचला. घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते आणि वनविभागाचे कर्मचारी  तातडीने घटनास्थळी हजर झाले. खचलेला घाट अत्यंत अरुंद असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला. तसेच खचलेल्या  भागाजवळ डोंगराची भिंत जेसीबीने खणून काढून रस्ता अधिक रुंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
कासकडे जाणार्‍या पर्यटकांच्या गाड्या सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकात अडवल्या होत्या. शेकडो गाड्या पुन्हा माघारी पाठवण्यात आल्या. मात्र, दूर दूरवरून  आलेल्या पर्यटकांनी ’बोगदा’मार्गे ठोसेघर किंवा सज्जनगडकडे जाण्याचा निर्णय घेतला.
ढासळलेल्या कठड्यांच्या जागी केवळ पांढरा रंग लावलेले दगड लावून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. कासला ’हेरिटेज’चा दर्जा प्राप्त झाल्यापासून  लाखो पर्यटकांची पावले इकडे वळाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर हा रस्ता अधिकाधिक रुंद आणि चांगला करण्याची गरज आहे.