Breaking News

अपात्र शेतकर्‍यांबाबत सहकारी निबंधकांकडे तक्रारी नोंदवा : सिंघल

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या पात्र शेतकर्‍यांची नावे आली नसतील अशा शेतकर्‍यांनी तसेच अपात्र  शेतकर्‍यांची नावे आली असतील तर इतर शेतकर्‍यांनी याबाबत सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे लेखी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन  जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील जांभ बु। येथील ग्रामपंचायतीमध्ये जिल्हाधिकारी सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजनेमधील शेतकर्‍यांच्या यादींचे वाचन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी तहसीलदार स्मिता पवार, सरपंच अर्चना निकम, उपसरपंच  हिंदुराव बोडके, प्रशांत पवार, प्रताप निकम उपस्थित होते.
प्रारंभी सिंघल यांनी गावाची पाहणी केली. त्यानंतर त्या म्हणाल्या, जांब गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे. या गावात मागच्या वर्षी या गावात जलयुक्त  शिवार योजनेतून चांगले काम झाले आहे. सन 2017-18 साठी या गावातील जलयुक्तच्या कामांच्या आरखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजनेतून या गावात 2 हजार सिताफळांची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांचे जगण्याचे प्रमाण 95 टक्केआहे. मागेल त्याला शेततळे या  योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छता हीच सेवा या मोहीमेंतर्गत जांब बु. येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी सिंघल यांनी सक्रीय सहभाग घेतला. यावेळी त्या  म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता आपल्यात अंगीकारली पाहिजे. यासाठी आपल्या परिसरात स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी. सर्व नागरी संस्थांनी नागरिकांचा  सहभाग घेवून ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून स्वच्छतेची व्यापक लोक चळवळ उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.