वाचनांतून नव्या विचारांची निर्मिती - डॉ. नागनाथ कोतापल्ले
पुणे, दि. 24, ऑक्टोबर - महाराष्ट्रात मराठी बोलणा-यांची संख्या 10 ते 11 कोटी एवढी आहे. मग वाचणा-यांची किती असेल याचे अनुमान लावता येईल. वाचनामुळे माणसाचे बौध्दिक विचारचक्र फिरते. बुध्दीला गती मिळते. त्यामुळे माणसाची जडणघडण होते व चिंतनशील वाचनांतून नव्या विचारांची निर्मिती होते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी चिंचवडमध्ये नुकतेच व्यक्त केले. साहित्यदर्शन संस्थेच्यावतीने वाचक महोत्सवात सण आणि साहित्य या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर, कवी राज अहेरराव, व्याख्याते राजेंद्र घावटे, कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, विश्वरत्न शाळेचे अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, अशोक तनपुरे, साहित्यदर्शनचे गणेश लोंढे, रवींद्र कासार आदी उपस्थित होते. डॉ. कोतापल्ले म्हणाले, जेव्हा युरोपमध्ये विमान, जहाजे, आणि तंत्रज्ञानाचा शोध लावत होता. तेव्हा महाराष्ट्र तुकोबारायांच्या गाथा बुजविण्यात व ज्ञानेश्वर महाराजांना छळण्यात व्यस्त होता. त्यामुळेच त्याकाळी भारतात संशोधन झाले नाहीत. त्या काळात देखील पण नव्या विचारवंतांस उदयास येऊ देत नव्हते. परिवर्तन करणा-यांना दडपून टाकले जात होते. तेव्हाही नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, क लबुर्गी, गौरी लंकेशसारख्या विचारवंतास मारले जात होते. पूर्वी आपला देश हा श्रवण करणा-यांचा देश होता. कथा, पुराण आणि कीर्तन तसे जीवन जगत होते. इंग्रजांनी शिक्षण सुरु केले. भारत ही जागतिक बाजारपेठ असल्याने अमेरिका व चीन भारतावर प्रेम करतोय. चीनला भारतीय बाजारपेठ गमवायची नाही म्हणून भारताच्या सीमारेषेवरुन चीनने माघार घेतली. कोणत्या नेत्यामुळे चीनने माघार घेतली नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता इंगळे यांनी केले. महादेव हुंबरे यांनी आभार मानले.