Breaking News

वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू

अकोले, दि. 09, ऑक्टोबर - अकोले तालुक्यातील आंबड येथे शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह सुरु झालेल्या पावसात वीज पडून  देवीदास मारुती जाधव (वय 40) या शेतकर्‍याचा दुर्देवी मृत्यू झाला.
हस्त नक्षत्राच्या अंतीम चरणात मुसळधार पावसाने सर्वदूर हजेरी लावली. अकोले तालुक्यातील आंबड परिसरामध्येही शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास पावसास  सुरुवात झाली. हा पाऊस सुरु असतानाच वीजांचाही मोठा कडकटाट होता. त्या कडकडाटातच आंबड - पाडाळणे रोडवरील जाधव वस्तीवर राहणारे देवीदास  जाधव हे जनावरांसाठी साचून ठेवलेला भूईमुगाचा पाला झाकण्यासाठी उठले होते. पाल्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकत असताना अचानक वीजेचा मोठा आवाज  झाला व ती कडकडणारी वीज थेट जाधव यांच्या अंगावर पडली. या वीजेच्या तीव्र झटक्याने जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी  धाव घेवून डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
काल सकाळी अकोले ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णालयातच अकोलेचे आमदार वैभवराव  पिचड, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नातेवाईकांची भेट घेवून धीर दिला. खा. सदाशिव लोखंडे यांनीही आंबड येथे जावून कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.  कामगार तलाठी बाबासाहेब दातखिळे, पोहेकॉ. बाळू पानसरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. श्री. जाधव यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ,  एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.