Breaking News

शेतकर्‍यांचे कैवारी असाल तर हमीभावाने शेतमालाची खरेदी करा!

कृषीमंत्री ना.फुंडकर यांना दिलीपकुमार सानंदांनी दिले आव्हान

बुलडाणा, दि. 09, ऑक्टोबर - एकीकडे राज्य सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले आहे. परंतू आज संपूर्ण देशात शेतमाल हा सर्व बाजारात हमीभावापेक्षा  कमी दराने विकला जात आहे. जर शेतकर्‍यांना हमीभाव मिळत नसेल तर सरकारने केलेल्या हमीभावाच्या घोषणेचे काय औचित्य असा प्रश्‍न उपस्थित करुन याला  सरकारची निती दोषी आहे फक्त शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून स्वत:ची वाहवाही लुटणारे हे सरकार खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे हिताची रक्षा न करता फक्त घोषणा करीत  आहे, असा आरोप करीत शेतकर्‍यांचे कैवारी असाल तर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी हमीभावाने शेतमालाची खरेदी त्वरीत सुरु करावी, असे आव्हान आमदार  राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिले आहे.
सरकारने जाहीर केलेले तुरीचे हमी भाव प्रति क्विंटल रु. 5450 असुन देशभरात 3800 ते 4000 रु. इतक्या कमी दराने तुर विकल्या जात आहे. याचप्रमाणे मुंगाचे  हमी भाव 5575 असुन 4800 रु. दराने विकल्या जात आहे. उडीदाचे हमी भाव 5400 प्रति क्विंटल असल्यावर फक्त 4300 इतक्या कमी दराने विकल्या जात  आहे. ज्वारीचा हमी भाव 1725 रु. प्रति क्विंटल आहे ती फक्त 1400 रु. दराने विकल्या जात आहे. सोयाबीन 3050 रु. प्रति क्विंटल 2800 रु. दराने विकल्या  जात आहे. अशाप्रकारे इतर शेतमालाचे सुध्दा हमी भाव अधिक असून प्रत्यक्ष देशभराच्या बाजारात कमी दराने विकल्या जात असून शासनाच्या नाकर्तेपणामुळे  शेतकरी नागवला जात आहे.
खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांची चिंता या सरकारला असेल तर सणासुदीच्या काळात शेतमाल हमी भावाने त्वरीत खरेदी करण्याची व्यवस्था करावी फक्त घोषणा करु नये.  एकीकडे सरकारने शेतकर्‍याला 7 ऑक्टोबर 2017 ला त्यांच्याकडे असलेल्या उडीद आणि मुंगाची नोंदणी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन करावी असे आवाहन  केले आहे. या ठिकाणी सांगावेसे वाटते की, काबाड कष्ट करुन दिवसभर रखरखत्या उन्हात राबणाया भोळ्या भाबड्या शेतकर्‍यांना इंटरनेटचे ज्ञान नसेल तर तो  ऑनलाईन नोंदणी कशी करेल? प्रत्येक ग्राामीण भागात इंटरनेट सुविधा तरी आहे का? इत्यादी प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
शासनाने यापुर्वी खरेदी केलेल्या मालाची रक्कम आजपर्यंत शेतकर्‍यांना देण्यात आलेली नसुन आता नविन हंगामात ऑनलाईनची पळवाट काढून वेळ मारुन नेण्याचा  मार्ग या सरकारने घाोधून काढला असून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत घोतकयांची पिळवणूक करण्याचा प्रकार चालविला आहे.
शासनाने हमी भाव जाहीर केले मात्र खरेदी करण्यास टाळाटाळ करीत आहे तर खाजगी व्यापार्‍यांनी भाव पाडल्यास त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार  असल्यामुळे त्यांनी माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यास नवल नाही. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर’ अशी परिस्थिती शेतकर्‍यांची झाली आहे.सणा सुदीच्या  काळात जर शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळाला नाही तर त्यांची दिवाळी निश्‍चित  रुपाने अंधारात जाईल यात तिळमात्रही शंका नाही. एकीकडे मोठया प्रमाणात  शेतकरी आत्महत्या करीत आहे. आणि कृषीमंत्री फुंडकर हे सत्कार करुन घेण्यातच मग्न आहे. कृषीमंत्री फुंडकरांकडे केवळ दररोज पोकळ घोषणा करण्याव्यतिरिक्त  काहीही नाही. तसेच त्यांची प्रकृती ठिक राहत नसल्यामुळे ते कृषीमंत्री पदाच्या पदाला न्याय देवू शकत नाही. म्हणुन त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा  द्यावा, अशी  मागणीही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे.
कर्जमाफी जाहीर होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला, 10 हजाराची अग्रीम मदत तर अद्याप मिळाली नाही, अनेक शेतकर्‍यांना ठिंबक सिंचन अनुदानाचे,  कांद्याच्या अनुदानाचे तसेच सोयाबीनचे अनुदान सुध्दा अद्याप मिळालेले नाही. दिवाळीपुर्वी प्रत्येकाच्या बँक खात्यात पैसे येतील अघाा थापा मारणारे प्रत्यक्षात  कर्जमाफीचा लाभ शेेतकर्‍यांना देतील की नाही याचाही भरवसा नाही. त्यामुळे फक्त घोषणाबाजी करण्यात पटाईत या सरकार विषयी समाजातील प्रत्येक घटकामध्ये  संतापाची लाट पसरली आहे.  शेतकर्‍यांची किती रक्कम शासनाकडे थकीत आहे याची आकडेवारी जाहीर करावी व ती रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये त्वरीत  जमा करावी तसेच हमी भावाने शेतमालाची त्वरीत खरेदी सुरु करावी अन्यथा नाईलाजास्तव शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन काँग्रेसला तीव्र आंदोलन  छेडावे लागेल असा इशारा राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला आहे.