Breaking News

बाजारात सिताफळाचा सुकाळ !

पुणे, दि. 09, ऑक्टोबर - सुरूवातीला पाऊस. त्यानंतर आता अचानक उष्णतेत वाढ झाल्याने तोडणीला येणार्‍या सिताफळांची संख्या वाढली आहे. परिणामी  जिह्यासह पुणे विभागातून मार्केट यार्डात सिताफळाची आवक वाढली आहे. रविवारी हंगामातील विक्रमी 30 टनाची आवक झाली. आवक वाढल्याने भावात गेल्या  आठवड्याच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी घट झाली आहे. सद्य:स्थितीत बाजारात सिताफळाचा सुकाळ आहे. त्यामुळे सिताफळाचे भावही सर्वसामान्यांच्या  आवाक्यात आले आहेत. 
येथील फळबाजारात वडकी नाला, सासवड, बारामती, शिवापूर, ऊरळी, लोणी, यवत, राजगुरूनगर, चाकण आणि औरंगाबाद परिसरातून सिताफळाची आवक  झाली. चांगल्या मालाला घाऊक बाजारात प्रतिकिलोला 150 रुपये पर्यत भाव मिळाला. तर मध्यम आणि लहान आकाराच्या मालाला प्रतिकिलोला 8 ते 70  रुपापर्यंत भाव मिळाला. अचानक आवक वाढल्याने ज्युस, पल्प, आईस्क्रीम, कुल्फीवाल्यांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक होऊनही  शेतकर्‍यांना समाधानकारक भाव मिळाला. तसेच मालही शिल्लक राहिला नसल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे आणि युवराच काची यांनी दिली.
सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा झाडाला फळधारणा चांगली आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस कमी होऊन उष्णतेत वाढ होणार असल्याने आवक  आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. परिणामी भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील. उष्णतेमुळे माल लवकर तयार होत असल्याने सद्य:स्थितीत गोवा,  मुंबई वगळता इतरत्र कोठेच माल पाठविला जात नाही. बहुतांश मालाची खरेदी शहरातील ग्राहक करीत आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात चांगल्या आणि मोठ्या  आकाराच्या मालाला प्रतिकिलोला 200 रुपये भाव मिळाला आहे. सद्य:स्थितीत मिळत असलेल्या भावावरही शेतकरीही समाधान व्यक्त करीत असल्याचे मोरे, कांची  यांनी यांनी सांगितले. जुनमध्ये हंगामाला सुरुवात झाली आहे. आणखी दोन महिने आवक सुरु राहणार असल्याचा अंदाज आहे. पहिल्या टप्यात चांगला भाव  मिळाला आहे. दुसर्‍या टप्यात दसरा, दिवाळी सण असल्याने मागणीत घट होते. आवकही अधिक असते. मात्र शेवटच्या टप्प्यात आवक घटते आणि मागणी वाढते.  त्यामुळे भावात वाढ होणार असल्याचा अंदाजही व्यापार्‍यांनी वर्तविला आहे.