Breaking News

वारकर्‍यांवरील खटले मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कराड, दि. 9 (प्रतिनिधी) : डाऊ केमिकल्स विरोधी आंदोलनातील वारकर्‍यांवर दाखल केलेले सर्व खटले लवकरात लवकर मागे घेतले जातील, अशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकर्‍यांना दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नाने वारकरी प्रबोधन महासमितीच्या  नेतृत्वाखाली वारकर्‍यांनी निवेदन दिले असता, मुख्यमंत्र्यांनी हे आश्‍वासन दिले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे आले होते. मुख्य सोहळा संपल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर  समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र वारकरी प्रबोधन महासमिती आणि देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मुख्यमंत्री  फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देहू येथील श्री संत तुकाराम महाराज तपोभूमीच्या  परिसरात डाऊ केमिकल्स कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या प्रकल्पामुळे या परिसरात अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या  भागाचे पर्यावरणीय आणि आध्यात्मिक महत्त्व टिकून राहावे यासाठी सन 2008 मध्ये वारकर्‍यांनी ’तुकाराम महाराज तपोभूमी बचाव आणि डाऊ कंपनी हटाव’  आंदोलन केले होते. यावेळी अनेक आंदोलनकर्त्या वारकर्‍यांवर खटले दाखल करून, त्यांना नाहक कायद्याच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. सामाजिक भावनेने  काम करणार्‍या वारकर्‍यांवर दाखल केलेले हे खटले त्वरीत मागे घेऊन, वारकरी संप्रदायाला दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस आणि  महसूलमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी वारकर्‍यांवरील खटले मागे घेण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.