Breaking News

भारताला वस्त्रनिर्मितीतील निर्यातदार होण्याची संधी : नितीन गडकरी

वर्धा, दि. 03, ऑक्टोबर - जगभरात ज्यूट, रेशीम, कापूस, बांबू आणि लिनन या पाच कच्च्या मालापासून सूत आणि कापड तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत  आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे. या धाग्यांचा उपयोग करून वस्त्रनिर्मितीचा प्रयोग झाल्यास या क्षेत्रातील निर्यातदार होण्याची संधी भारताला आहे, असे  प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट आणि सेवाग्राम विकास  आराखड्यातील कामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
महात्मा गांधींच्या जयंतीदिनी भविष्यातील नवीन भारत निर्माणाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. खादी ग्रामोद्योग ही गांधीजींनी दिलेली देणगी आहे. त्यामुळे  आगामी काळात खादीच्या उत्पादनाला व्यावसायिक जोड देण्याची आवश्यकता आहे. रस्ते जोडणी आणि ड्रायपोर्टमुळे शेतमालासह इतरही उत्पादन विदेशात  पाठविण्याची संधी निर्माण झाली आहे. याचा या परिसरातील नागरीकांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याशिवाय, शेतकर्‍यांच्या विकासासाठी सिंचन महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्याचे सिंचन क्षेत्र हे 18 वरून 40 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचीही  माहिती श्री. गडकरी यांनी दिली.
राज्याला पर्यावरणयुक्त, आरोग्ययुक्त, जलयुक्त आणि व्यसनमुक्तीसोबतच रोजगारयुक्त करण्याचा संकल्प केला असल्याचॅ माहिती देत 266 कोटी रूपयांच्या विकास  आराखड्यातील कामांमधून सेवाग्राम ही जागतिक प्रेरणाभूमी बनेल व देशाला दिशादर्शक भूमी ठरेल, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.