Breaking News

ठिबक सिंचनासाठी 440 कोटी निधीची महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी

मुंबई, दि. 17, ऑक्टोबर - पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ठिबक सिंचन कार्यक्रमासाठी 440 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात  आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी सहसंचालक शिरीष जमदाडे यांनी दिली आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत देशातील ठिबक सिंचन कार्यक्रमाचा आढावा केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहसचिव श्रीमती निरजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्राच्या ठिबक सिंचन कार्यक्रमाची माहिती श्री.जमदाडे यांनी सादर केली व 440 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये महाराष्ट्राला ठिबक सिंचन कार्यक्रमासाठी 620 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, यातील केंद्र शासनाचा हिस्सा हा 380  कोटी रुपयांचा आहे व उर्वरित हिस्सा हा राज्य शासनाचा आहे. महाराष्ट्रात ठिबक सिंचनामध्ये मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत3 लाख शेतकर्‍यांना  ठिबक सिंचन कार्यक्रमाचा लाभ देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नाशिक, जळगांव, सोलापूर,पुणे आदी जिल्ह्यांमध्ये ठिबक सिंचनाचे मोठे काम झाले असून महाराष्ट्रातील इतर  जिल्ह्यातही ठिबक सिंचन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्राने 60 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. 380 कोटीचे  मंजूर अर्थ सहाय्य व 60 कोटी रुपयांची अतिरिक्त अनुदान असे 440 कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मिळावा, अशी विनंती केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. मंजूर  अनुदानापैकी महाराष्ट्राला 190 कोटी रुपये अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री.जमदाडे यांनी यावेळी दिली.