Breaking News

कालिदास महोत्सव 17 नोव्हेंबरपासून

नागपूर, दि. 24, ऑक्टोबर - संस्कृत साहित्याचे महाकवी कालिदासांना समर्पित असलेल्या कालिदास महोत्सवाचे येत्या 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले  आहे. नागपुरातील नवनिर्मीत सुरेश भट सभागृहात आयोजित या महोत्सवात कालिदास लिखीत ऋतूसंहार केंद्रस्थानी राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी  आज पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी माहिती देताना अनुपकुमार म्हणाले की, तीन दिवस चालणार्‍या या सांस्कृतिक महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. नागपूरकर रसिक  श्रोत्यांसाठी मोठीच मेजवानी राहणार असून 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता कालिदास महोत्सवाचा शुभारंभ होणार असून पहिल्या दिवशी सप्तक प्रस्तुत सहा ऋतूंचे सहा  सोहळे ऋतूंवर आधारित रागांचे शास्त्रीय गायन आणि वादन असणार आहे.त्यामध्ये अरविंद उपाध्ये यांचे बासरीवादन, शिरीष भालेराव यांचे व्हायोलिन, अरविंद शेवलीकर यांचे  सितारवादन तर अनिरुध्द देशपांडे, सायली आचार्य आणि रेणुका इंदुरकर या त्रिकुटाचे शास्त्रीय गायन असेल. तर रात्री 8.30 वाजता पूरबाई या कार्यक्रमांअंतर्गत कोलकात्ता येथील  देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्यातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व सितार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या विशेष उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर  करणार आहेत.
तसेच दुस-या दिवशी 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मन वृंदावन या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन कार्यक्रमांअंतर्गंत श्रीमती आस्था गोस्वामी यांना ऐकता येणार  आहे. तर सायंकाळी 7.45 वाजता उपस्थितांना थक्क करणारे पुण्याच्या नादरुप ग्रूपच्या गुरु शमा भाटे आणि त्यांच्या चमूची कथ्थक नृत्य नाटीका पाहायला मिळणार आहे.  त्याचप्रमाणे रात्री 9 वाजता नवी दिल्लीच्या पंडीत उदयकुमार मल्लिक यांच्या धमारवरील धृपद धमार गायनाचा कार्यक्रम असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
तर शेवटच्या दिवशी सायंकाळी ऋतूचक्र या शास्त्रीय गायन कार्यक्रमांतर्गंत मुंबईच्या पं. रोनू मजुमदार आणि पं.सतीश व्यास यांच्यातील जुगलबंदी ऐकायला मिळेल. त्यानंतर संध्याक ाळी 7.15 वाजता वसंतरास या कार्यक्रमांतर्गंत ओडीशी समूह नृत्यामध्ये भोपाळच्या बिंदू जुनेजा आणि त्यांच्या चमूचे नृत्य पाहायला मिळणार आहे. तर रात्री 8.45 वाजता ऋतूरंग  कार्यक्रमांतर्गंत पुण्याचे संजीव अभ्यंकर आणि मुंबईच्या अश्‍विनी भिडे-देशपांडे यांच्यातील शास्त्रीय गायनातील जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क असून  रसिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन अनुपकुमार यांनी यावेळी केले.