Breaking News

ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रमात थोडक्यात बदल

मुंबई, दि. 13, सप्टेंबर - राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात काहीसा बदल करण्यात आला आहे. दुसर्‍या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16  ऑक्टोबर 2017 रोजी, तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2017 रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिली.
राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणार्‍या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम 1  सप्टेंबर 2017 जाहीर केला होता. त्यानुसार 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार होतं, मात्र 14 ऑक्टोबर 2017 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन  असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती.संबंधित विभागीय आयुक्तांकडून याविषयी अहवाल प्राप्त  झाल्यानंतर आता 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.