Breaking News

सिकलसेल आणि थॅलेसेमिया रूग्णांसाठी सुसज्ज हॉस्पिटल सुरु करणार : नितीन गडकरी

नागपूर, दि. 11, सप्टेंबर - नागपूरसह पूर्व विदर्भात सिकलसेल, थॅलेसेमिया यासारख्या प्राणघातक रक्तविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.  नागपूर येथे 250 खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र सुरु करण्यात आले. केंद्र शासनातर्फे आवश्यक संपूर्ण मदत देण्यात येईल यासाठी वैद्यकीय शिक्षण  विभागाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात रक्तपेशी दानाला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा ट्रस्ट, मॅरोडोनर रजिस्ट्री ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त  विद्यमाने देशातील पहिल्या मॅरोडोनर नोंदणीचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुषृष्ठ  वाहतूक मंत्री नितिन गडकरी होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.
या वेळी गडकरी म्हणाले की, नागपूरसह विभागासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. ल्युकेमिया, लिमफोमा, सिकलसेल, थॅलेसेमिया आदी आजारासाठी रक्तपेशीचे दान  देण्यासाठी निरोगी रक्त दात्यांची माहिती संकलित होणार आहे.
नागपूरातील एकाच भागात 40 हजार सिकलसेलचे रुग्ण असल्यामुळे तसेच विभागातील इतरही जिल्ह्यात मोठया प्रमाणात या आजाराचे रुग्ण असल्याने त्यांना  आवश्यक वैद्यकीय सुविधा व या आजारावर संशोधनाची आवश्यकता आहे.
उत्तर नागपुरातील साडेचार एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुसज्ज 250 खाटांचे रुग्णालय सुरु करण्याबाबत केंद्रीय वैद्यकिय विभागाच्या अधिका-यांसोबत  हॉस्पिटल सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येत असून यासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक निधी व पुढाकार घेतल्यास केंद्र शासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येईल. या  प्रकल्पासाठी टाटा ट्रस्टतर्फे सुध्दा सहकार्य घेण्यात येणार आहे. इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सिकलसेल रुग्णांसाठी स्वतंत्र केंद्र सुरु करण्यात आले  होते. हे केंद्र सुरु करण्यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयात उत्कृष्ठ काम करणार्‍या डॉक्टरांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. डॉक्टारांनीसुध्दा गरीब रुग्णांना  चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणले की, पहिल्या मॅरोडोनर रजिस्ट्रीला सुरुवात होत असल्यामुळे रक्तपेशी सारख्या दुर्धर आजारावर प्रभावी  उपाययोजना करणे सुलभ होणार आहे. सरासरी चार ते पाच हजार रुग्णांना बोन मॅरोची आवश्यकता आहे. त्यासाठी इच्छुक दात्यांची यादी तयार झाल्यास त्यांना  लाभ देणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे अवयव दानाची चळवळ तसेच जनजागृती करण्याची गरज असून राज्यात 14 हजार रुग्ण किडनीसाठी प्रतिक्षा यादीवर आहे.  यातील केवळ 1-1 रुग्णांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दान मोहिमेत सहभाग घेतल्यास सात रुग्णांना जीवनदान  मिळू शकते. या चळवळीला मोठया प्रमाणात जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.