विरोधी पक्षांचे अस्तित्व नसल्यानेच शिवसेना आक्रमक - खा. विनायक राऊत

सावंतवाडी, दि. 26, सप्टेंबर -  राज्यात महागाईबरोबरच अनेक समस्यांनी जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाचे अस्तित्व कोठेही दिसत नसल्याने  शिवसेनेला विरोध करावा लागत आहे. यातून शिवसेना सरकार विरोधी किंवा सत्तेतून बाहेर पडणार असा अर्थ लावू नये, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे खा. विनायक  राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.
सत्तेत राहून जनतेची कामे केली जाऊ शकतात, यासाठी सत्तेतून बाहेर पडण्याची आवश्यकता नाही, असेही राऊत म्हणाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या  भाजप प्रवेशाचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही. राणे आले म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. परंतू आगामी काळात राणे यांना पक्षात घेतल्याचा  पश्‍चात्ताप भाजपला होईल, असेही खा. राऊत यांनी सांगितले.