Breaking News

कोल्हापुरातील पूरजन्य परिस्थितीबद्दल आयुक्तांना जाब विचारणार - आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, दि. 15, सप्टेंबर - गेल्या पाच दिवसांपासून शहरात सायंकाळी धुंवाधार पाउस पडत आहे. काल बुधवारी सायंकाळी पावसाने शहरात थैमान घातले.  वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात शहराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नाल्यांच्या काठाला असणार्‍या नागरी वस्तीमध्ये पाणीच पाणी झाल्याने अवघ्या  मध्यरात्रीत पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे या परिसरातील नागरिकानी जीव मुठीत घेऊन रात्र काढली. या  पावसामध्ये काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असून, विल्सन पुलावरील फुलेश्‍वर महादेव मंदिराचे शेड पाण्यात वाहून गेले आहे. काल रात्रभर भागातील  नागरिक आणि शिवसैनिकांकडून मदत कार्य सुरु आहे.
आज सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाय.पी.पोवार नगर, शास्त्रीनगर, उद्यमनगर, शाहूपुरी कुंभार गल्ली आदी भागाची पाहणी केली. या परिस्थितीमुळे  नुकसान झालेल्या यादवनगर येथील यशोदा कांबळे आणि शास्त्रीनगर येथील संदीप घाटगे यांच्या कुटुंबियाना आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीची प्रत्तेकी दहा  हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यासह विल्सन पुलावरील फुलेश्‍वर महादेव मंदिराचे नवीन शेड बांधण्याकरिता पन्नास हजार रुपयांची मदत देण्याचीही  ग्वाही दिली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी तहसीलदार, महानगरपालीकेचे अधिकार्यांना बोलावून आवश्यक पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. यासह  तातडीने या परिसरातील स्वच्छता करून औषध फवारणी करण्याच्या सुचना दिल्या. नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका, असे स्पष्ट  शब्दात सुनावले.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कालच्या पावसाने शहरातील प्रमुख भागात खास करून नाल्यांच्या शेजारील भागात पाण्याचा प्रवाह वाढल्याने  पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या मदतीने शिवसैनिक नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवीत आहेत.  परंतु या पूरपरिस्थितीचा विचार केला असता, रेड झोन क्षेत्रातील अवैध बांधकामे जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. विधानभवनात उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर  मा.मुख्यमंत्री महोदयांनी रेड झोन क्षेत्रात बांधकामाला महानगरपालिकेने परवानगी देऊ नये, असा आदेश दिला असतानाही, रेड झोन क्षेत्रात अवैध बांधकामांचे प्रमाण  वाढले आहे. नाल्यांची रुंदी कमी करून, नाल्यात भर टाकून बांधकामे केली आहेत. नाल्यांची रुंदी कमी झाल्याने सखल भागात पाणी साठून राहत आहे. काही  ठिकाणच्या नाल्यांचे अस्तित्व बंद केले आहे. त्यामुळे निश्‍चितच पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने शहरातील प्रमुख भागात ही पूरपरिस्थिती उद्भवली आहे.  यासह पूर संरक्षक भिंतीचे अपूर्ण कामही या परिस्थितीस जबाबदार आहे. प्रशासनाच्या आणि काही बांधकाम व्यावसायिकांच्या अवैध कामांचा फटका शहरातील  सर्वसामान्य जनतेला बसत असून, रेड झोन क्षेत्रातील अवैध बांधकामांना महानगरपालिका जबाबदार आहे. याचा कोल्हापूर महानगरपालिका आयुक्ताना जाब  विचारणार असून, येणार्‍या अधिवेशनातही याबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.