Breaking News

आज इंदूरला तिसरा एकदिवसीय सामना

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली तिसरी वन डे आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाला ही वन डे  जिंकून पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्याची उत्तम संधी आहे. कुलदीप यादवनं घेतलेली हॅटट्रिक कोलकात्याच्या वन डेमध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी  निर्णायक ठरली. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारत दौर्‍यात मनगटी फिरकीला सामोरं जाताना प्रचंड दडपणाखाली आहेत, हे कुलदीपच्या या हॅटट्रिकनं ईडन गार्डन्सवर  पुन्हा एकदा दाखवून दिलं.
कोलकात्याच्या दुसर्‍या वन डेत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 253 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं  32 षटकांत 5 बाद 148 धावांची मजल मारली होती. पण 33 व्या षटकात कुलदीप यादवनं मॅथ्यू वेड, अ‍ॅश्टन अ‍ॅगर आणि पॅट कमिन्सला लागोपाठच्या तीन  चेंडूंवर माघारी धाडलं आणि सामना भारताच्या बाजूनं झुकवला. कुलदीप यादवच्या हॅटट्रिकला दुसर्‍या एंडनं यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्‍वर कुमारकडून लाभलेली साथ  कांगारुंना आणखी कोंडीत पकडणारी ठरली. एकंदरीत, चेन्नईपाठोपाठ कोलकात्याच्या वन डेतही भारतीय गोलंदाजांचं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर निर्विवाद वर्चस्व  दिसून आलं.