Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारांना राजकीय पक्षांचे चिन्ह नाही

मुंबई, दि. 02, सप्टेंबर - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 7 हजार 576  ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचाही समावेश आहे.
यावर्षी सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र  उमेदवारांना राजकीय पक्षांच्या चिन्हाचं वाटप केलं जाणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या  निवडणुकीसाठीही निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही,  असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.