Breaking News

तिसर्‍या एकदिवसीयसह भारताने मालिका जिंकली

इंदूर, दि. 25, सप्टेंबर - कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंदूरच्या तिसर्‍या वन डेत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. पाच वन डे सामन्यांच्या  मालिकेत भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली. या मालिकेत भारताची आता 3-0 अशी विजयी आघाडी  झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 294 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य  रहाणेने 139 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया रचला.
हार्दिक पंड्या आणि मनीष पांडेने त्या पायावर विजयाचा कळस चढवला. रोहित शर्माने सहा चौकार आणि चार षटकारांसह 71 धावांची, तर अजिंक्य रहाणेने नऊ  चौकारांसह 70 धावांची खेळी केली. मग हार्दिक पंड्याने 78 धावांची खेळी उभारून भारताला विजयपथावर नेलं. मनीष पांडेनेही भारताच्या विजयात नाबाद 36  धावांचं योगदान दिलं. त्याआधी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सहा बाद 293 धावांची मजल मारली होती. अ‍ॅरॉन फिन्चने 125 चेंडूंत 12 चौकार आणि  पाच षटकारांसह 124 धावांची खेळी उभारली. त्याने डेव्हिड वॉर्नरच्या साथीने सलामीला 70 आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या साथीने दुसर्‍या विकेटसाठी 154  धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळवलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तीनशेचा  पल्ला ओलांडता आला नाही.