Breaking News

सत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते - सुनिल तटकरे

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्‍नावर आक्रमक होत आहे. त्यामुळेच सत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते.  राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार जास्त असल्याचे यातून स्पष्ट होते. सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मागासवर्गीय विभागाच्या (ओबीसी सेल) राज्यस्तरीय मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.
ओबीसी समाजाच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्‍नाकडे सरकार कमालीचे दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या आश्‍वासनाची पूर्तताही केली नाही. आघाडी  सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याबाबत खास लक्ष दिले जात होते. राष्ट्रवादीने शिष्यवृतीतही वेळोवेळी वाढ केली होती.
शिवसेनेने केलेल्या पेट्रोल दरवाढ आंदोलनावर तटकरे यांनी टीका केली. शिवसेना सरकारमध्ये सामील आहे, मग निर्णय घेत असताना शिवसेनेचे मंत्री काय  करतात? शिवसेनेचा दुटप्पीपणाचा हा बुरखा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फाडायला हवा, असे निर्देश तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे म्हणाले की भाजप सरकार ओबीसी समाजाच्या जोरावर उभे राहिले आहे पण भाजपने आता ओबीसी  समाजालाच दुर्लक्षित केले. आपण सेलचे संपूर्ण राज्यभरात हजारो सक्रीय कार्यकर्ते तयार करू. येणार्‍या काळात संपूर्ण ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी  उभा करू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.