Breaking News

जिल्ह्यातील प्रवरा, गोदावरी व भिमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर, दि. 27, ऑगस्ट - भारतीय हवामान खात्याने  उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये  दिनांक 26 ते 28 ऑगस्ट 2017 या कालावधीत  अतिवृष्टी  होणार असल्याचे कळविले आहे.  जिल्हयातील  प्रवरा गोदावरी व भिमा या नदयांना  पाण्याचा विसर्ग सुरु आहे.  धरणाच्या पाललोट क्षेत्रामध्ये  पाऊस झाल्यास धरणाच्या  पाणीसाठयात  वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांनी कळविले आहे.
आगामी काळात अहमदनगर तसेच नशिक व पुणे जिल्हयात पावसामुळे वा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्हयातून वाहणा-या  गोदावरी, भिमा, घोड, कुकडी, प्रवरा, मुळा  व सिना  तसेच इतर नदयांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील नागरिकांना मदत व्हावी  यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.
स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.  नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे,  नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पुर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुन्या /मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी, वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रक कक्ष स्थापन  करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री क्रमांक 1077 आणि दुरध्वनी क्रमांक  0241-2323844 व 2356940 वर संपर्क साधावा असे  आवाहन करण्यात आले आहे.