Breaking News

सुसंवाद साधला तर वार्धक्य आनंदमय : डॉ. लाहोटी

सातारा, दि. 21 (प्रतिनिधी) : आजच्या काळात वृध्दाश्रम अथवा केअर टेकर सेंटर ही काळाची गरज असून वृध्दांचे अखेरचे जीवन सुसह्य व आनंदी कसे होईल हे पाहण्याची गरज आहे. एकाकीपणा हा वृध्दांचा सर्वात मोठा शत्रू असून वृध्दांशी नातेवाईकांसह इतरांनी सुसंवाद साधला तर वार्धक्य आनंदमय होईल, असे मत डॉ. कन्हैयालाल लाहोटी यांनी व्यक्त केले.
येथील शिवविजय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री मंगलमूर्ती केअर टेकर सेंटरच्या द्वितीय वर्धापन दिन व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या काळात खरे तर समाजात वृध्दाश्रम व केअर टेकर सेंटर फार मोठी भूमिका पार पाडत आहेत. जीवनातील वृध्दपणाचा काळ प्रसन्न वातावरणात गेला पाहिजे अशी केअर टेंकर सेंटरची भूमिका असली पाहिजे आणि ती या ठिकाणी दिसून येत आहे. केअर टेंकर सेंटर म्हणजे केवळ औषधांचे व्यवस्थापन न राहता वृध्दांचे जीवन आनंदी, सुखमय व त्यांच्या स्नेहीजनांबरोबर सहजपणे जगता येण्याचे ठिकाण झाले पाहिजे असेही डॉ. लाहोटी म्हणाले.
एकाकीपणा हा माणसाच्या आयुष्याला छळणारी गोष्ट आहे. एकाकीपणामुळे अनेक समस्या उभ्या राहतात. यातून बाहेर पडण्यासाठी वृध्दांना मित्र पाहिजेत. वृध्दांसाठी भावनिक गुंतवणुक महत्त्वाची असल्याचे डॉ. अरविंद काळे यांनी सांगितले. श्री मंगलमूर्ती ग्रुपचे प्रमुख सयाजी चव्हाण यांनी श्री मंगलमूर्ती ग्रुपच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी केअर टेंकर सेंटरमधील ज्येष्ठ नागरिक चाचा मेवेकर तसेच अरुणकुमार राजहंस, शाहीर नारायण कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी श्री मंगलमूर्ती केअर टेंकरच्या दोन वर्षातील कामाचा आढावा घेतला. यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या सुभाष शिवाजी जाधव (सातारा), द्वितीय क्रमांक शाहीर नारायण कदम (धोेंडेवाडी, ता. खटाव), तृतीय क्रमांक अनिल गोपाळ भावेकर (देऊर, ता. कोेरेगाव), चतुर्थ क्रमांक ताराचंद्र नारायण आवळे (फलटण), पाचवा क्रमांक अरुणकुमार राजहंस (सातारा) यांचा मान्यवराच्या हस्ते रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत केशव चव्हाण, सौ. निलम चव्हाण, सूर्यकांत जेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. जयदिप चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास विलासपूर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.