औरंगाबादसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद, दि.30 : उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडयात 29 ते 31 ऑगस्ट 2017 या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानी वर्तवली आहे. नाशिक व वरील भागातील धरण साठा मध्ये आणखी पाऊस पडत राहला तर अतिरिक्त पाणी सोडले जाणार आहे तरी जिल्हयात नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसेच नदीकाठाच्या गावांनी सावधानता ठेवावी, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या कालावधीत वादळी वार्यासह विजा कोसळण्याची शक्यता आहे. नागरीकांनी झाडाच्या आसर्याला न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अतिवृष्टीच्या काळात पावसाळी पाण्याची आवक वाढत राहिल्यास अतिरिक्त जलसाठा विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीक, विद्यार्थ्यांनी पाण्याच्यास्त्रोतापासुन दुर राहावे. पुलावरुन पाणी जात असल्यास त्यावरुन आपले वाहन नेऊ नये. नदीकाठच्या गावांना अतिसावधतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास नागरिकांनी सतर्क रहावे. या सूचना व्यतिरिक्त जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्यात यावी. याबाबत वेळोवेळी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयास त्वरीत माहिती दयावी. आपतकालीन परिस्थितीत दुरध्वनी क्रमांक 0240- 2331077,( 1077) या टोल फ्री नंबरवर व 9970977452 वर संपर्क साधावा,असेही आवाहन औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने केले आहे.