Breaking News

रस्त्यावरील खड्डे ,विसर्जन व्यवस्था यांवर नाराजीचा सूर !

कल्याण, दि. 21, ऑगस्ट - कल्याण शहरातील रस्त्यांच्या आणि विसर्जन घाटाच्या दुरावस्थावर कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या  प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याणचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका आढावा बैठकीचे आयोजन आयकॉन प्लाझा  सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, महावितरणचे राठोड, परिमंडळ 3 अंतर्गत  येणार 8 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच कल्याणमधील सार्वजनिक गणपती मंडळाचे प्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते.  कल्याणात जागोजागी असलेले खड्डे आणि विसर्जन घाट या महत्वाच्या समस्या असल्याचे सर्व मंडळांनी सांगितले. गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन  ठेपलेला असताना विसर्जन घाटातील जलपर्णी, सफाई याकडे महापालिका दरवर्षीप्रमाणे दुर्लक्ष का करते ? असा सवाल मेळा संघाच्या पदाधिका-यांनी  उपस्थित केला.
भर पावसात खड्डे बुजवले जात आहेत यावरून महापालिका किती निष्कळजीपणे काम करीत आहे.तर महिनाभरापूर्वीच नियोजन का केले जात नाही ?असे  सवाल शहर अभियंताना विचारण्यात आले गणेश मंडळाना एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यातही काही ठिकाणी टाळाटाळ केली जात असल्याचे एका  मंडळाच्या पदाधिका-यांनी सांगितले. तर शहरातील मुख्य रस्त्यावर गटारीचे मॅनहोल उघडे आहेत, उत्सव काळात रस्त्यावर उघड्यावर अन्नपदार्थ विकले  जातात त्यावरही कारवाही करण्याची मागणी मंडळांनी केली .विसर्जन करणार्‍या कोळी बांधवाना गेली दोन वर्ष कोणतेही मानधन मिळत नसल्याची व्यथा  कोळी बांधवांच्यावतीने मांडण्यात आली.महापालिका परिसरात कल्याण पूर्वेत तीन,तर पश्‍चिमेत एका ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असल्याची  माहिती कुलकर्णी यांनी दिली. सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असे आश्‍वासन शहर अभियंता कुलकर्णी यांनी दिले.2 सप्टेंबरला बकरी  ईद आणि त्याच दिवशी मेळा संघातील गणपतींचे विसर्जन असल्याने सुरक्षेची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही पोलीस उपायुक्त डॉ.संजय शिंदे यांनी  दिली.