Breaking News

मोरबे धरण पूर्ण भरले; शुक्रवारी जलपुजनचा कार्यक्रम

नवी मुंबई, दि. 29, ऑगस्ट - महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने अर्थात 87.75 मीटरपर्यंत भरल्याची माहिती  अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली. त्यामुळे किमान यावर्षी तरी नवी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नसले,तरी नागरिकांनी जपून  पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. महापालिकेतर्फे धरणावर जलपुजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
मुंबई महापालिकेनंतर नवी मुंबई महापालिकेला स्वत:चे धरण आहे. पूर्वी धरण नसल्यामुळे अन्य प्राधिकरणांकडून मिळणा-या पाणी पुरवठ्यावर नवी मुंबईकरांना  अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी कापत होऊन पाणी वितरणाच्या नियोजनाचे बारा वाजत होते. परिणामी महापालिकेच्या अनेक महासभा या  पाण्यावर गाजल्या होत्या. मात्र मोरबे धरण घेतल्या पासून नवी मुंबईकरांची पाण्याची समस्या निकालात निघाली आहे. या धरणामुळे गेल्या काही वर्षांपासून मागील  वर्षे वगळता कधी पाणी कपातीला सामोरे जावे लागले नाही. मागील वर्षी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नव्हता, तरी शिल्लक पाणी साङ्ग्यामुळे नोव्हेंबरपर्यंत पुरेल  इतका पाणीसाठा झाला होता. यंदा मात्र पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काल 87.75 मीटरपर्यंत धरण भरले आहे. त्यामुळे धरणातून  पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज पाण्याचा विसर्ग (धरणातून पाणी सोडणे) करण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम असला,तर किमान दिवसाआड  किंवा दररोज देखील धरणातून नदीला पाणी सोडावे लागणार आहे. मागील वर्षी जुलै अखेर 76 मीटरपर्यंत धरण भरले होते. मागील वर्षी सप्टेंबर अखेर धरणात  167 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला होता. धरणाचा ओव्हर फ्लो पॉईन्ट 88 मीटरला आहे. विशेष म्हणजे 2013 साली धरण क्षेत्रात चांगला पाऊस  पडून धरण ओव्हर फ्लो पॉईन्टपर्यंत भरले होते. त्यांनतर गेली चार वर्षे धरण ओव्हर फ्लो पॉईन्टपर्यंत भरले नव्हते. मात्र यंदा चांगला पाऊस पडल्याने सध्या  धरणात 190.98 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नवी मुंबईकरांवरील पाणी संकट तुर्तास तरी टळल्यात जमा आहे.  शुक्रवारी सकाळी 10 वाजता मोरबे धरणावर जलपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली.