पैठण तालुक्यातील चौदा गावांत एक गाव एक गणपती
औरंगाबाद, दि. 25, ऑगस्ट - सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संतुलन आणि तंटामुक्त गणशोत्सव साजरा करण्यासाठी पैठण पोलिसांनी ‘एक गाव एक गणपती’ ही मोहीम मागील तीन वर्षांपासून सुरू केली आहे. यंदाही पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा गावांत ‘एक गाव एक गणपती’बसवण्यात येणार आहेत. पैठण नगर परिषद पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेश मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गिरी यांनी दिली. प्रत्येक गणेश मंडळासमोर पोलिस बंदोबस्त देण्याची कायदा सुव्यवस्था राखण्याची कसरत पोलिसांना करावी लागते. यातून गावात कधी कधी तणावाचे वातावरण निर्माण होते. असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस निरीक्षक गिरी यांनी रामनगर, सोनवाडी, तेलवाडी, तांदुळवाडी, दादेगाव, इस्माईलपूर, वडवाळी, श्रृंगारवाडी, आगर नांदर, करंजखेड, नाटकरवाडी, जुने कावसान, सायगाव, वाघाडी या ठिकाणी शांतता समितीची बैठक घेऊन ‘एक गाव एक गणपती’ बसवण्याचे आवाहन केले. सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समाजप्रबोधन होईल असे नाटक, पथनाट्य आदी स्पर्धा काही गणेश मंडळांच्या वतीने ठेवण्यात आल्या आहेत. दिला.