Breaking News

रहदारीला अडथळा ठरणारी 3 हजार 418 वाहने 18 महिन्यात जप्त

मुंबई, दि. 25, ऑगस्ट - मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर सोडून दिलेली वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे जप्त  करण्यात येतात. यानुसार 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2017 या दरम्यान 3 हजार 418 वाहने जप्त करण्यात आली होती. यापैकी 80 टक्कयांपेक्षा अधिक  म्हणजेच 2 हजार 747 वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे या वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन)  श्री. रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या लिलावातून महापालिकेला 95 लाख 96 हजारांचा महसूल प्राप्त झाला. तर याच  कालावधी दरम्यान संबंधितांद्वारे सोडविण्यात आलेल्या 612 वाहनांच्या दंडापोटी महापालिकेला 46 लाख 26 हजार 390 रुपयांची प्राप्ती झाली आहे, अशी माहिती  अतिक्रमण निर्मूलन खात्याचे सहाय्यक आयुक्त श्री. विश्‍वास शंकरवार यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहनांमुळे सार्वजनिक परिसरात अतिक्रमण होण्यासोबतच रस्त्यावरील  वाहतूकीला देखील अडथळा होत असतो. तसेच या वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू - मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती  होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याद्वारे (ठ.ए.) मुंबई महापालिका अधिनियम कलम 314 नुसार जप्त करण्यात  येतात. यानुसार 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2017 या दीड वर्षाच्या कालावधी दरम्यान 3 हजार 418 वाहने जप्त करण्यात आली होती. यामध्ये 2 हजार 217  दुचाकी,300 तीनचाकी आणि 901 चारचाकी वाहनांचा समावेश होता. यापैकी 612 वाहने दंड भरुन संबंधितांद्वारे सोडवून नेण्यात आली. या दंडापोटी संबंधितांनी  46 लाख 26 हजार 390 रुपये एवढी रक्कम महापालिकेकडे जमा केली. या 612 वाहनांमध्ये 193 दुचाकी, 50 तीनचाकी; तर 369 चारचाकी वाहनांचा समावेश  होता.
महापालिकेने जप्त केलेल्या वाहनांपैकी जी वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, अशा वाहनांच्या बाबतीत महापालिका अधिनियम कलम 490 (3)प्रमाणे  वजनानुसार लिलाव केला जातो. यानुसार 2 हजार 747 वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. तर उर्वरित 59 वाहने ही विविध पोलीस खटल्यांशी संबंधित  असल्याने लिलावातून वगळण्यात आली. लिलाव करण्यात आलेल्या 2 हजार 747 वाहनांचे वजन हे साधारणपणे 5 लाख 95 हजार 120 किलो एवढे होते. या  मध्ये सुमारे 1 लाख 94 हजार 600 किलो एवढ्या वजनाच्या 1 हजार 976 दुचाकी, 65 हजार 570 किलो एवढ्या वजनाच्या 243 तीनचाकी आणि 3 लाख 34  हजार 950 किलो एवढ्या वजनाच्या 528 चारचाकी वाहनांचा समावेश होता. हा लिलाव ’ऑनलाईन लिलाव’ (श-र्रीलींळेप) पद्धतीने नुकताच आयोजित करण्यात  आला होता. यानुसार 95 लाख 96 हजार रुपये एवढ्या अंतिम बोलीला या वाहनांची विक्री झाली आहे. तर संबंधितांदवारे सोडविण्यात आलेल्या वाहनांपोटी 46  लाख 26 हजार 390 रुपये एवढी दंड रक्कम महापालिकेकडे जमा झाली आहे. याप्रमाणे दंड व लिलाव याद्वारे महापालिकेकडे 1 कोटी 42 लाख 22 हजार 390  रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे, अशीही माहिती श्री. शंकरवार यांनी दिली आहे.