Breaking News

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या संपाचा फायदा परराज्यातील शेतकर्‍यांना!

वसई, दि. 06 - संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या शेतकरी संपाचा फायदा सुरत, दिल्ली, इंदूर, बेळगाव येथील व्यापार्‍यांनी घेतला आहे. भाजी मार्केटमध्ये सध्या  भाज्यांचे भाव कडाडले असल्याने व्यापारी तसेच गृहिणींना भाजी खरेदी करताना डोईजड जात आहे. मात्र, वसई-विरार भागात गुजरात-सुरत येथील भाज्यांची  रेलचेल दिसून येत आहे.  
वसई-विरार परिसरात अनेक भाजी मार्केट आहेत. येथे नाशिक, जुन्नर, वाशी येथील मार्केटमधून रोज भाज्यांचे ट्रक येतात. मात्र, सध्या शेतकर्‍यांच्या सुरु असलेल्या  संपामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाजीमाल वाशी मार्केटमध्ये येत नाहीत. ट्रकवाले आंदोलकांच्या हिंसक कृतीमुळे घाबरत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या संपाचा  फायदा सध्या सुरत, दिल्ली, इंदोर, बेळगाव येथील व्यापार्‍यांनी घेतला आहे. येथून माल हा वाशीच्या मार्केटमध्ये येत आहे आणि तेथून व्यापारी हे ट्रकने वसई-विरार  क्षेत्रात वितरीत करीत आहे.
शेतकर्‍यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील मेथी, पालक, वांगी, शेपू या गावठी भाज्या मिळत नाहीत. पण इतर राज्यातून येणारा भोपळा, सुरण, काकडी, भेंडी, परवर,  सिमला, मिरची, आरवी, वटाणा, फ्लॉवर, कोबी, तोंडली, आलं हा भाजीपाला मिळत आहे. भाज्यांचे दर वीस ते तीस टक्क्याने कडाडले आहेत. या कडाडलेल्या  भावामुळे भाजीपाला विकणार्‍या विक्रेतांची फार तारांबळ उडत आहे. गिर्‍हाईकांना वारंवार समजावून सांगावं लागतं आहे. तर सामान्य गृहिणीचंही महिन्याचं बजेट या  वाढत्या दरामुळे पूर्णपणे कोलमडून गेलं आहे.