Breaking News

जल, जमीन आणि जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. 06 - जल, जमीन आणि जंगल वाचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज यशवंतराव चव्हाण  प्रतिष्ठान येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुख्य सचिव सुमित मल्लिक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण  मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन बलगन, आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एकीकडे आपण विकास करतोय पण त्याच बरोबर पर्यावरणाची हानी होते. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे पर्यावरण  संवर्धन हे मोठे आव्हान आहे. शासनाने 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी 4 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जल,  जमीन आणि जंगलाला आपल्या पुर्वजांनी ईश्‍वराचा दर्जा दिला आहे. या तिन्ही गोष्टी नष्ट झाल्यातर कुणीही जगू शकणार नाही. जगाला एका सुत्रात बांधुन एकात्मता  टिकविणे हा सृष्टीच्या सुत्राचा भाग आहे. ते सुत्र आपल्या पुर्वजांना चांगले समजले होते. अलिकडच्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तो कधी खुप  पडतो, तर कुठे पडत नाही. त्यामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. या पाठीमागे पर्यावरणाचे संतुलन बिघडणे, हेच मुख्य कारण आहे. पुर्वी गावा-गावात  नदी-नाले, तलाव, छोटे बंधारे असायचे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न नव्हता. अलिकडच्या काळात हे सर्व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आपण नष्ट केले. पाणलोटाचे नुकसान  केले. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणून शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरु केली. त्यामुळे पाणीसाठा वाढला, शेकडो गावांना  पाणी मिळाले. लातूर जिल्ह्यात आज एकही टँकर लागत नाही. हे जलयुक्त शिवारचे यश आहे. ॠमाती, गाळ काढा आणि शेतात टाकाॠ हा कार्यक्रम हाती घेतला  असून राज्यातील 54 हजार तलावातील गाळ काढून शेतात टाकणार आहोत. त्यामुळे शेती सुपीक होऊन भरघोस उत्पादन वाढेल, असे सांगून ते शेवटी म्हणाले की,  उद्योगांनीही पर्यावरणपुरक उद्योग सुरु केले पाहिजेत. कार्बन कमी करण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
पर्यावरण मंत्री श्री. कदम म्हणाले की, प्रदुषण हा जगभरात भेडसवणारा प्रश्‍न आहे. उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटची घरे झाली, पावसाचे प्रमाणही  कमी झाले, हवेत कार्बन वाढले याचा परिणाम पर्यावरण र्‍हासात झाला. गेल्या दोन वर्षापासून वन विभागासोबत 50 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे.  प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र ही मोहिम सुरु आहे. प्रत्येकाने किमान 10 झाडे लावून ती जगवली पाहिजे.
मुख्य सचिव श्री. मल्लिक यावेळी म्हणाले की, आपल्याकडे समुद्राच्या तापमानावर पाऊस अवलंबून असतो. 90 दिवस पाऊस येतो. तो पुरेसा नाही. त्यासाठी  मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे. पाण्याची बचत केली पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीचे उत्पादन वाढले आहे. प्रत्येक गावाने पाण्याचे स्त्रोत निर्माण  करुन पाण्याचा प्रश्‍न सोडविला पाहिजे. शहरातून सोलर एनर्जीचा वापर वाढला पाहिजे. प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे.
प्रारंभी पर्यावरणावरील माहितीपट दाखविण्यात आला. डॉ.अनबलगन यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर पर्यावरणाचा संदेश  असलेल्या एम.टी.एन.एल. च्या बिलाचे, हवा गुणवत्ता अहवाल पुस्तिकेचे, ब्रेन लिपीतील पर्यावरण पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात  आले. तसेच वसुंधरा पुरस्कार-2017, पर्यावरण वसुंधरा लघु चित्रपट स्पर्धा विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. जलसंवर्धन केलेल्या गावांना पारितोषिक देऊन  सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यावरण पुरस्कारप्राप्त नागरीक, संस्थांचे प्रतिनिधी, अंध मुले, पर्यावरणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार वितरण
जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यात पर्यावरणाचे संवर्धन करणा-या विविध संघटना आणि संस्थाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात  आले.
वसुंधरा पुरस्कार 2017 चे प्रथम पारितोषिकाचे रेमंड युको डेनिम प्रा.लि. लेाहार, जिल्हा यवतमाळ हे मानकरी ठरले. तर द्वितीय गॉडफ्रे फिलीप्स इंडिया लिमीटेड,  नवी मुंबई आणि जॉन डिअर इंडिया प्रा.लि. पुणे हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. या पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि  दिड लाख रोख प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
वृक्ष लागवड आणि संगोपनाकरीता विशेष गौरव म्हणून मे.पाल फॅशन प्रा.लि., एम.आय.डी.सी. बोईसर यांना 17 हजार वृक्ष लागवडीकरिता विशेष पारितोषीक देऊन  गौरविण्यात आले.