Breaking News

राज्यभरात शेतकर्‍यांचं टाळेठोक आंदोलन

मुंबई, दि. 06 - कर्जमाफीसाठी शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी आज बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर  शेतकर्‍यांनी अनोखं आंदोलन केलं. जागरण गोंधळ आंदोलन करत शेतकर्‍यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संपूर्ण कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव देण्याची  मागणी शेतकर्‍यांनी केली.
कर्जमाफी आणि शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी पुकारलेला संप सहाव्या दिवशी तीव्र झालं आहे. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. या वेळी 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर कोल्हापूर आणि  नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील रायपूरमध्ये आंदोलकांनी तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलं. कोल्हापुरातल्या शिये गावात रघुनाथदादा पाटील प्रणित  शेतकरी संघटनेनं तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकरी संपाचा परिणाम शहरांमध्ये जाणवायला सुरुवात झाली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात केवळ 1 टक्केच भाज्यांची आवक झाली आहे तर दूधाचं संकलन  झालंच नाही आहे. यामुळे नगरमध्ये आज लोकांची मोठी गैरसोय होणार आहे. कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्तांच्या  घरासमोरच भाजीपाला फेकून दिला. यामध्ये पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.