Breaking News

शेतकरी संपाला पाठिंबा, शेतमालाची नासाडी करु नका : राजू शेट्टी

कोल्हापूर, दि. 02 - राज्यातील शेतकरी संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकर्‍यांनी शेतमालाची नासाडी करुन आंदोलनाला हिंसक वळण लावू नये, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
शेतकर्‍यांचा संप मिटेपर्यंत स्वाभिमानीचा दूध संघ बंद राहिल. राज्यातील इतर दूध संघांनी संघ बंद ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले. बळीराजा का खवळला याचा विचार करायला पाहिजे. मान्सूनच्या तोंडावर शेतकरी आतून पेटलेला आहे. शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वर्षांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अजूनही त्यावर विचार झालेला नाही, असे राजू शेट्टी म्हणाले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. गरज नसेल तेव्हाही आयात केली जाते. त्याचे परिणाम शेतकर्‍यांना भोगावे लागतात, असेही शेट्टींनी सांगितले.