Breaking News

आधारकार्ड यंत्रणा बंद असल्याने बळीराजाचे अडचणीत

सातारा, दि. 06 - प्रत्येक क्षेत्रात सर्वांनाच आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, दि. 2 एप्रिलपासून आधार कार्ड बनविण्याची सुविधाच सातारा जिल्ह्यात  बंद पडली असल्याने बळीराजाचे वांदे झाले आहे.
सी.एस.सी. एन.पी. एसटी नेटवर्क पेपर्स लिमिटेड या कंपनीला सातारा जिल्ह्यात आधारकार्डचे काम देण्यात आले होते. मात्र, आधारकार्डची यंत्रणाच ठप्प झाली  असल्याने वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
सीएससी कंपनीने अद्ययावत यंत्रणेचा वापर केल्यापासून आधारकार्डच निराधार झाले आहे. आधारकार्ड मिळत नसल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, पालक, महिला  त्रस्त आहेत. सरकार शेतक-यांना म्हणते 1 जूनपासून खते घेताना प्रत्येकाने आधार लिंक असलेले बँक खाते असले तरच खते आणि बियाणाचा दुकानदारांकडून  पुरवठा केला जाईल. आधार कार्डाशिवाय कुठेही आधार मिळणार नाही. आधार कार्ड बनविण्यासाठीचे सॉफ्टवेअर सी.एस.सी. कंपनीला दिले होते त्यानुसार त्यांची  सेवा सातारा जिल्ह्यात पुरवली जात होती. जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रात आधार कार्डसाठी नोंदणी करुन आणि गावोगावी शाळा, महाविद्यालयामध्ये कॅम्पसचे  आयोजन करुन नागरिक, विद्यार्थ्यांना आधार कार्ड 5 दिवसांत तर पोस्टाद्वारे 15ते 20 दिवसात मिळत होते. सी.एस.सी कंपनीच्या कामकाजावर जिल्हाधिकारी  कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून आधार कार्डचे काम तांत्रिक बाबीमुळे बंद पडले आहे. आधार कार्ड हे शासन स्तरावर सक्तीचे आणि आवश्यक मानले जात असून  जिल्ह्यातील अनेकजण यापासून वंचित असल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनेकांना घेता येत नाही. शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची  वेळ अनेकांवर येणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत ज्या घरात पहिली मुलगी जन्माला आली आहे अशांना शासन स्तरावरुन 2 हजार रुपये दरमहा  आधार लिंक असलेल्या बँक खात्यात परस्पर जमा होण्याची योजनाही सध्या आधार कार्ड प्रक्रिया बंद पडल्याने अडचणीत सापडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने  या गंभीर प्रश्‍नाकडे जातीने लक्ष घालून आधार कार्ड काढण्यासाठी तालुकापातळीवर प्रत्येक तालुक्यात एक केंद्र सुरू करावे.