Breaking News

शेतीच्या विकासासाठी!

दि. 01 जुलै - देशात आजमितीस लोकसंख्येचा वेग वाढतो आहे, मात्र रोजगाराचा वेग हा सातत्याने मंदावतो आहे, कर्जबाजारी अवस्था, आणि अनियमित पडणारा  पाऊस यामुळे  ग्रामीण भागातील वर्ग हा शहराकडे धाव घेत आहे. अशा परिस्थितीत रोजगांराची समस्या ही गंभीर झाली आहे. मुबलक प्रमाणात पाणी नसल्यामुळे  उद्योगधंद्यांचे उत्पादन काहीसे मंदावले आहे, त्याचाही परिणाम रोजगांरावर होतांना दिसून येत आहे. कर्जबारातीपणामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ झाली आहे.  प्रामुख्याने विचार केल्यास शेतकरी आत्महत्या होणार्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त पीक उत्पादनावरच अवलंबून आहे, असे निदर्शनास येते. त्या घरातील व्यक्तीला  शेतीसोबतच कोणताही जोडधंदा नसल्यामुळे, पुरेसा पाऊस पडला नाही तर, कुटुबांचे उत्पन्न थांबते, परिणामी चार पैसे मिळवण्यासाठी कोणताही मार्ग हातात नसतो,  त्यामुळे आत्महत्या करण्याची मानसिकता त्याची तयार होत जाते. आज देशातील 60-65 टक्के वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात  रोजगार असूनही आजची पिढी शेतीत काम करायला तयार नाही. कारण आजचा तरुण शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यांची तुलना करू लागला आहे. शहरी  भागाच्या मानाने ग्रामीण भागात अत्यंत अल्प प्रमाणात सोयी-सुविधा आहेत. शेती व्यवसाय कष्टाचा, अनेक संकटांमधून चालणारा अशाश्‍वत व्यवसाय आहे. लहरी  हवामान, वर्षोनुवर्षे पडणारा दुष्काळ, सरकारचे उदासिन धोरण, शेतकरी धोरणावर उपाययोजना करण्यात अपयशी, यामुळे ग्रामीण भागातील मोठा वर्ग यहराकडे  स्थलातंरित होतांना दिसत आहे. आपल्याकडे होणारा पाऊस त्यामानाने चांगला आहे, मात्र त्याचे नियोजन आपण करत नाही, चार महिने पडणार्‍या पावसाची आपण  जर योग्यरित्या त्याचे साठवण, पुर्नभरणा केला तर वर्षभर पाणीसमस्या जाणवणार नाही, मात्र त्याकडे आपण सातत्याने दुर्लक्षच केले आहे, परिणामी दुष्काळ, आणि  शेतकर्‍यांच्या आत्महत्या सारख्या समस्या उभ्या राहतात. ग्रामीण भागामध्ये युवकांना आकर्षित करून शेतीमध्ये त्यांनी त्यांचे करिअर करण्यासाठी ठोस उपाययोजना  राबविणे गरजेचे आहे. कौशल्यावर आधारित कृषी व कृषिपूरक व्यवसायाचे शिक्षण घेतल्यानंतर स्वयंरोजगार निर्मितीसाठी योग्य ते सहकार्य करावे लागेल. ज्याप्रमाणे  शाश्‍वत उद्योग व्यवसायासाठी योजना तयार करून उद्योगांना राज्यात आकर्षित करते, त्याचप्रमाणे शेतीउद्योग व्यवसायासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठी विशेष  योजना तयार कराव्या लागतील. शेतीसाठी अवलंबून असणारा समुदाय हा 60-65 टक्के असतांना या वर्गाकडून येणारे उत्पन्न हे अल्प आहे. त्यामुळे शेतीधोरणांचा  आढावा घेण्याची खर्‍या अर्थाने गरज आहे, शेतकरी कसा सक्षम होईल, तंत्रज्ञानात्मक बदल कसे करता येईल, याचाही विचार आपल्याला येणार्‍या काळात करावा  लागणार आहे. अन्यथा येणारे दुष्काळ शेतकर्‍याला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही.