Breaking News

हवामान खात्यावर गुन्हे नोंदवा, अंदाज चुकल्याने शेतकरी आक्रमक

वर्धा, दि. 22 - पावसाचे चुकीचे अंदाज वर्तवणार्‍या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी वर्ध्याच्या शेतकर्‍यांनी केली आहे. हवामान खात्याने पावसाचा  अंदाज वर्तवूनही पाऊस न पडल्यामुळे शेतकर्‍यांचा पारा चढला आहे.
हवामान खात्याचे अंदाज पाहून आम्ही सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसानं सलग तीन आठवडे तोंड दाखवलं नाही. परिणामी अख्खं पीक  जळून गेलं. त्यामुळे आता आम्हाला दुबार पेरणी करावी लागत असल्याचं सांगत शेतकर्‍यांनी आपला संताप व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षात हवामान खात्याचे अंदाज  आणि पाऊस यांचा ताळमेळ लागत नाही, त्यामुळे खोटे अंदाज वर्तवून शेतकर्‍याचं नुकसान करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, असं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे.