Breaking News

आगामी निवडणुकीत विरोधकांना हिसका दाखविणार- डॉ. पतंगराव कदम

सांगली, दि. 17 - लोकसभा- विधानसभा निवडणुकीतील विजयाने कायांना स्वर्ग दोन बोटं उरल्यासारखे झाले आहे. त्यामुळेच ही नेतेमंडळी वसंतदादा पाटील  यांच्या सांगली जिल्ह्यात निवडणुका जिंकल्याच्या फुशारक्या मारत आहेत व विनाकारण आपल्याबाबत जनतेत गैरसमज पसरवित आहेत. मात्र या नेत्यांना हिसका  दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. ज्या सहकारी साखर कारखान्यामुळे  वसंतदादा पाटील देशाचे नेते झाले, त्याच साखर कारखान्याला भाडेतत्त्वावर चालविण्यास देऊन त्यांच्या वारसदारांनी त्यांचे नाव धुळीस मिळविले, अशी घणाघाती  टीकाही त्यांनी केली.
सांगली महापालिकेतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आलेले डॉ. पतंगराव कदम येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते. केवळ नरेंद्र मोदी लाट व त्यानंतर  घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळेच भारतीय जनता पक्षाला लोकसभा- विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळाले. आपल्या पलूस-  कडेगाव विधानसभा मतदारसंघातही त्याचाच फटका आपणाला बसला. मात्र या पराभवाने डॉ. पतंगराव कदम संपले, ते आता पुढील कोणतीही निवडणूक लढविणार  नाहीत, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. परंतु लोकसभा की विधानसभा निवडणूक लढायची, हे त्यावेळच्या परिस्थितीवर ठरविणार असून  कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना हिसका दाखवून देणार आहे.
राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. कारण, भाजप व शिवसेना या दोघांनाही सत्ता प्रिय आहे. त्यामुळे भाजप नाईलाजास्तव  का होईना शिवसेनेशी जुळवून घ्यावे लागणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपप्रणित आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. काँग्रेसने भाजपविरोधी सर्व राजकीय  पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. परिणामी राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल वेगळा लागू शकतो, असेही ते म्हणाले.
शेतक-यांना कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आमदारांनी वारंवार आवाज उठविला होता. या मागणीसाठी काँग्रेस  आघाडीच्यावतीने संघर्ष यात्राही काढण्यात आली. त्यानंतर पुणतांबा येथील शेतक-यांनी बेमुदत संप आंदोलन उभारले. विरोधकांच्या या दबावामुळेच राज्य शासनाला  कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडले. पण त्यासाठी कोणते निकष निश्‍चित आहे, याची माहिती घ्यावी लागेल. कर्जमाफी हा एक तात्पुरता दिलासा असून शेतकर्यांना  कायमस्वरूपी मदत करायची असेल, तर शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला पाहिजे, असे मतही डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.
वसंतदादा पाटील केवळ राज्याचे नव्हे, तर देशाचे नेते होते. त्यांनी मोठ्या कष्टाने सहकारी साखर कारखाना उभारला होता. हा साखर कारखाना देशातील सहकार  चळवळीसमोर आदर्शवत होता. त्यांच्यासारखा तळागाळातील जनतेत मिसळणारा दुसरा नेता राज्यात नव्हता. मात्र त्यांच्या नावाचा सहकार क्षेत्रातील आदर्शवत असा  साखर कारखाना त्यांच्या वारसदारांच्या नाकर्तेपणामुळे बंद पडला. आता तो भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. वारसदारांच्या या कृतीमुळे वसंतदादा  पाटील यांचे नाव धुळीस मिळाले आहे, अशी टीकाही डॉ. पतंगराव कदम यांनी केली.