Breaking News

राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांमध्ये फूट, काँग्रेसच्या नेतृत्वात 17 पक्षांची बैठक

नवी दिल्ली, दि. 22 - राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वात आज 17 विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मात्र यापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेड पक्ष विरोधकांपैकी एक महत्वाचा पक्ष आहे. पण नितीश कुमार यांनी विरोधकांना पाठ दाखवल्याने विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्र आहे. तर रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रपती होणं आणखीच सोपं झालं आहे.
नितीश कुमार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने मोदींविरोधात रणनिती आखत असलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांच्या नियोजनात फूट पाडली आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांचं एकत्र सरकार आहे. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयाने लालू प्रसाद यादव यांची अडचण झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात 17 विरोधी पक्षांची बैठक तर होणार आहे. मात्र विरोधकांकडे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ उरलेलं नाही. त्यामुळे विरोधक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी काय करणार, त्याकडे लक्ष लागलं आहे.
एनडीएकडे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी सध्या 5 लाख 32 हजार मतं आहेत. ओडिशातील सत्ताधारी पक्ष बीजेडीनेही रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. बीजेडीकडे 37 हजार 257 मतं आहेत. एनडीएला दक्षिणेकडील दोन प्रमुख पक्ष वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसनेही पाठिंबा दिला आहे. तर नितीश कुमार यांची 20 हजार 779 मतंही एनडीएच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एनडीएकडे एकूण 6 लाख 29 हजार 658 मतं आहेत. तर निवडणूक जिंकण्यासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज आहे. म्हणजेच एनडीएकडे बहुमतापेक्षाही जास्त मतं आहेत.