पाकिस्तानी नागरिकाशी बळजबरीने लग्न लावल्याचा तरुणीचा आरोप
नवी दिल्ली, दि. 09 - बंदुकीचा धाक दाखवून माझे ताहीर अली या पाकिस्तानी तरुणाशी लग्न लावून दिल्याचा आरोप एका 20 वर्षीय भारतीय तरुणीने केला आहे. तसेच माझ्याजवळील महत्वाची कागदपत्रेही हिसकावून घेण्यात आल्याचे या तरुणीने सांगितले आहे.उझमा असे या तरुणीचे नाव असून भारतात परत जाण्यासाठी तिने पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाकडे धाव घेतली आहे. उझमाने दोन पानी याचिकेत आपले म्हणणे मांडले आहे. मलेशियामध्ये ताहिरसह मैत्री झाल्यानंतर केवळ मैत्रीखातर मी पाकिस्तानमध्ये गेलो होते. मात्र ताहिरच्या गावी गेल्यानंतर ताहिरने माझा छळ केल्याचे याचिकेत नमूद केले आहे. भारतात परत जाण्यासाठी उझमा पाच मे पासून इस्लामाबादमध्ये असलेल्या भारतीय दुतावासात ठाण मांडून बसली आहे. 1 मे रोजी ताहिरच्या सांगण्यावरुन ती पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर 3 मे रोजी तिचा ताहिरसह जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचेही तिने सांगितले.
